वाघोली (पुणे) – गावाच्या पाणी पुरवठा योजनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाण्याची चोरी केसनंद ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली.
नागरिकांना पाण्याची कमतरता वारंवार भासत होती. नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी शुभम सावंत आणि अजिंक्य हरगुडे यांनी साई हिल्स नावाच्या गृहप्रकल्प सुरू असलेली पाणी चोरी पकडून उजेडात आणली आहे. माजी उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे, प्रमोद भाऊ हरगुडे, संतोष गावडे, गणेश हरगुडे, मल्हारी भंडकर, नवनाथ साळुंके, गणेश जाधव, बाबासाहेब हरगुडे, राजेश दरेकर आदींनी पाणी चोरी पकडली. या ठिकाणी सुरू असलेले बेकायदा पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे.
मात्र ग्रामंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. याबाबत साईहिल्स गृहप्रकल्पाच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पाणी चोरी किती दिवसांपासून सुरू होती? याचा रीतसर पंचनामा करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
पाणी चोरी बाबत ग्रामपंचायीतर्फे लोणीकंद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात येणार आहे. पोलीस चौकशीत अनेक बाबी उघड होतील
प्रमोद हरगुडे
ग्रामपंचायत सदस्य केसनंद
बांधकाम परवानगी देण्याबाबतची सर्व माहिती घेऊन जर चुकीच्या पद्धतीने बिगरशेती केली असेल तर ती रद्द करण्यासाठी माहिती सेवा समितीचे माध्यमातून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे .
चंद्रकांत वारघडे
अध्यक्ष, माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य