मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे काल ती मुंबईत दाखल झाली. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह कंगना मुंबईत दाखल झाली आहे.
दरम्यान, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केली.
यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं.
दरम्यान,अभिनेत्री कंगना राणावत आणि सत्ताधारी शिवसेना हे प्रकरण चांगलेच चिघळले असून यामध्ये आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उडी घेतली आहे. ‘ही कारवाई निंदनीय असून… सूडाच्या राजकारणात सामान्य मरतो’ असं ते म्हणाले.
जे घडलं ते अत्यंत चुकीचं! निंदनीय! या मुंबई मधे मी जन्मलो. ही आडवी तिडवी वाढली ती पुर्ण अधिकृत आहे? वर्षानुवर्षे अडचणी जाणवतात. त्याला जबाबदार कोण? @mybmc मनावर घेतलं असतं तर, याआधीच असंख्य ठिकाणी #JCB चालले असते. राजकारण करा पण ते कोणत्याही बाजूने सुडाचं नको. यात सामांन्य मरतो.
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) September 9, 2020
केदार शिंदेंनी आपल्या ट्विट म्हटलं कि, “जे घडलं ते अत्यंत चुकीचं! निंदनीय! या मुंबईमध्ये मी जन्मलो. ही आडवी तिडवी वाढली ती पूर्ण अधिकृत आहे? वर्षानुवर्षे अडचणी जाणवतात. त्याला जबाबदार कोण? मुंबई महापालिकेने मनावर घेतलं असतं तर, याआधीच असंख्य ठिकाणी जेसीबी चालले असते. राजकारण करा पण ते कोणत्याही बाजूने सूडाचं नको. यात सामान्य मरतो.’
बांधकाम अनधिकृत असेल तर, पाडायला हवेच!! पण ते बांधकाम बांधताना संबंधित@mybmc अधिकाऱ्यांना समजलं नाही? मग तेही तितकेच दोषी आहेत. त्यांना तर #suspend करायला हवं ना? परवानगी दिलीच कशी?
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) September 9, 2020
केदार शिंदेंनी मुंबई महापालिकेला टॅग करत पुढे ट्विट केलं, “बांधकाम अनधिकृत असेल तर, पाडायला हवेच. पण ते बांधकाम बांधताना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना समजलं नाही? मग तेही तितकेच दोषी आहेत. त्यांना तर निलंबित करायला हवं ना? परवानगी दिलीच कशी?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.