कामशेत – भुरट्या चोरांचा सुळसुळाट, गर्दुल्यांचा अड्डा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कामशेत रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानाकावरून ये – जा करणार्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणावर? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कामशेत रेल्वे स्थानकावरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात. दिवसभरात अनेक लोकल गाड्या ये – जा करीत असतात. या वेळी लोकलने प्रवास करीत असलेल्या असंख्य प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने कामशेत हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. कामशेत रेल्वे स्थानकाच्या परिसरात नामांकित महाविद्यालय, जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळा आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे हा उत्तम पर्याय आहे परंतु कामशेत रेल्वे स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. कामशेत रेल्वे स्थानकावर एक पोलीस चौकी असावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
तिकीट मशीन चालू ; वापर बंद
लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकाच्या तिकीट गृहाजवळच तिकीट मशीन बसवण्यात आली आहे. परंतु त्याचा वापर होताना दिसत नाही. हे मशीन बर्याच वेळा बंद अवस्थेत असते त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे मशीन असूनदेखील लोकलचे तिकीट काढण्यासाठी तिकीट गृहासमोर रांगाच रांगा असतात.
रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहे बंद
कामशेत रेल्वे स्थानकावर दोन प्रसाधनगृहे आहेत त्यातील एकही प्रसाधनगृह चालू नाही त्यामुळे महिला वर्गात मोठी नाराजी आहे. महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
स्थानकात परिसरात भिकार्यांचा वावर
पाण्याचे कूलर बंद
रेल्वे स्थानक परिसरात ऑटो रिक्षा व दुचाकींचे अतिक्रमण
मागील अनेक दिवसांपासून कामशेत रेल्वे स्थानकावर बर्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकावर अनेक दिवसांपासून प्रसाधनगृहे बंद आहेत त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
– सचिन शेडगे, प्रवासी