गुलजार हे माझे आवडते कवी. समजायला लागलं तशी मी गुलजार, पाश, अमृताप्रितम यांच्या कवितांकडे ओढली गेले. कविता म्हणजे मानवी भावभावना आणि त्यांतील कधी तलम तर कधी ओबडधोबड, कच्चे धागे आणि त्यांची विण उलगडून दाखवणारी अभिव्यक्ती… नात्यांची गुंफणही काहीशी या कवितेसारखीच असते. काही नाती जन्मभर जोडलेली असतात, काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतेही नाव न देता… एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे. तू ही रे माझा मितवा…
हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो. त्यातली सहजता तितकीच महत्त्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते, मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशीमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा,शुष्कता हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय. सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही. मुळात घडवायची हा शब्दही चूकच. त्यांना त्यांच्या कलेनं घडू द्यायचं. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं. शांतपणे सोबत करायची.
अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही. अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण… पटकन जीव लावणं, पटकन प्रेम करणं, पटकन विश्वास ठेवून मोकळं होणं आणि पटकन कुणाला आपलं माणूस मानणं अशा वाईट सवयी असणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की माणसं मोठ्या खड्यासारखी वेचायचं असतात. खूप पारखून, खूप वेळ घेऊन त्यांना आपल्या आत आपलं म्हणून सामावून घ्यायला प्रचंड वेळ दिला पाहिजे. असे निवडक वेचक दोन चार खडे हाती असले तरी ते उरतात. भसाभसा माणसांवर जीव टाकून मोकळं झालं की वाळूने भरलेली मूठ रिती व्हायला काही सेकंद लागतात. आपली म्हणून जमवलेली माणसं कधी आपल्याला वाईट ठरवतात ते कळतही नाही आणि ते कळेपर्यंत आपण त्या नात्यात गुंफलेलो असतो, जे नंतर पश्चातापाची वेळ आणायला कारणीभूत ठरते. अशावेळी अनेकदा नात्यांमध्ये जवळीक असण्यापेक्षा एक दुरावा, अंतर किंवा समांतरता असावी असं मला वाटतं. अशी समांतरता राखली तर नात्यांमधली गोडी टिकून राहील. नाती टिकतील,लोणच्यांसारखी खमंग होतील. आपण मात्र विणकराच्या भूमिकेत राहून या नात्यांमधला प्रत्येक धागा आणि त्या धाग्याची इतर धाग्यांशी असलेली गुंफण जपत राहायची.
गंमत अशी की या गुंफणीतला प्रत्येकजण; स्वतःच एक धागाही असतो आणि विणकरही. या गुंफणीतले धागेही प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेले. त्यांची जुळवून घेण्याची, समरस होण्याची, ताणले जाण्याची क्षमताही निरनिराळी असते. जेव्हा ही गुंफण नवी असते तेव्हा या धाग्यांची किंवा नात्यांची चमक, विश्वासार्हतता चमकदार आणि मजबूत असते पण नाती जेव्हा जुनी होत जातात… धागे, बंध जीर्ण होवू लागतात तेव्हा मात्र पुन्हा स्वतःला विणकराच्या भूमिकेत आणून या नात्याच्या धाग्यांची गुंफण पुन्हा नव्याने विणावी. त्यातली चमक टिकवावी. विणकर जसा प्रत्येक धाग्याचा पोत, रंग इ. चा विचार करून, समजून घेऊन मगच एकत्र विणतो आणि ते विणताना बंध सैल होणार नाहीत, गाठी… निरगाठी होणार नाहीत यांची दक्षता घेतो तशीच काळजी नाती गुंफतानाही घेतली गेली पाहिजे.
मनं, वैचारिकता, भावनिक बंध जुळवताना या विणकराची भूमिका महत्त्वाची. त्याच्या विणकामातील कौशल्याने, विचाराने आणि अनुभवाने तो जसे टिकावू वस्त्र गुंफतो तशीच ही मानवी नात्यांची गुंफण व्हावी.
गुलजार यांनी आपल्या एका कवितेत म्हटलेच आहे…
“मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे!
रिश्ता बुनके मैने भी इकबार जोके देखा था…’
गुंफण बांधलीच पाहिजे आणि चिरंतन टिकण्यासाठी विणकरही झाले पाहिजे.
मानसी चिटणीस