जयाभाऊ फक्त आमदार नव्हे, नामदारही होणार : गोपीचंद पडळकर
सातारा – भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व माजी आमदार जयकुमार गोरे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरापासून विराट रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ बाजार पटांगणावर जाहीर सभा झाली. सभेत बोलताना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, माण-खटावच्या जनतेला पुढील तीस वर्षे जयकुमार गोरे हेच लोकप्रतिनिधी म्हणून हवे आहेत. हे नेतृत्व जनताच जपणार आणि वाढवणार आहे. फक्त जयकुमार गोरेंना रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले असतील तर त्यांनी राजकारण सोडावे, कारण ते फक्त आमदार नाही तर नामदारही होणार आहेत.
शरद पवारांनी दुष्काळी तालुक्यांवर नांगर फिरवण्याचे काम केले. जनता आज महायुतीच्या पाठीशी आहे. मोदींनी जगात देशाची उंची वाढवली आहे. भाजपने 47 हजार कोटी सिंचनासाठी दिले आहेत. जयकुमार गोरे हे पाणीदार नेते आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांना लागेल तितका निधी दिला आहे. शरद पवार माढ्यात, रोहित पवार कर्जतमध्ये चालतात, मग गोपीचंद बारामतीत का चालत नाही?
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, जयकुमार गोरे जे बोलतात, ते करतात. आता आम्ही दोघे मिळून मतदारसंघाचा विकास वेगाने करणार आहोत. जे गद्दारी करतील, त्यांची गय केली जाणार नाही. जयकुमार गोरेंसमोर कुणीच टिकणार नाही. अद्याप वेळ आहे. गद्दारी करायचे डोक्यात असणाऱ्यांनी परत यावे. पक्ष त्यांचा सन्मान करेल.
सदाशिव खाडे म्हणाले, जयाभाऊंच्या पाठीशी आम्ही ताकद उभी केली आहे. पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेणाऱ्यांनी वेळीच चूक सुधारावी. जयकुमार गोरेंना माण, खटावचा पाणीप्रश्न सोडविण्यात यश आले आहे. पुढील काळातही आम्ही विकासात कमी पडणार नाही.
मतदार बंधू, भगिनींनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जयकुमार गोरेंनी केले. विकल्प शहा यांनी प्रास्ताविक केले. सभेस भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, कराड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महारॅलीत फटाक्यांची आतषबाजी, गगनभेदी घोषणा
अर्ज भरण्यापूर्वी सिद्धनाथ मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. रॅलीच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. “कोण आला रे कोण आला, माण-खटावचा वाघ आला’, “आता नाय सुट्टी, जयाभाऊची खुट्टी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दहिवडी बाजारपटांगणावर सभेच्या गर्दीनेही उच्चाक केला.