नवी दिल्ली – जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरची स्थिती खूप चांगली होती, अशी टीका कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. केंद्रातील भाजपच्या सरकारने खूप बदल घडवण्याची आश्वासने दिली असली तरी फारसा फरक पडलेला नाही, असे ते म्हणाले.
370 वे कलम हटवल्यामुळे खूप बदल होईल, असे सांगण्यात येत होते. विकास, रुग्णालये, बेरोजगारी या सर्व मुद्द्यांचा विचार केला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात यापैकी काहीही घडलेले नाही. उलट वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत जम्मू काश्मीरची स्थिती यापेक्षाही खूप चांगली होती, असे आझाद यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला गेला, याची बोचणी सर्वसामान्य नागरिकांना जाणवते आहे. हे राज्य दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे, याचेच दुःख आहे. काश्मीरची विधानसभा विसर्जित केली गेली तेव्हापासूनच आमचा पराभव झालेला आहे, असे आझाद म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन दिवसांचा जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि जम्मू काश्मीरमध्ये विकास होत असल्याचा दावा केल्याच्या पाश्वभूमीवर आझाद यांनी ही टीका केली आहे.