जळगाव – राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात थांबता थांबत नाहीत. यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक टायर फुटल्याने बस रस्त्यालगतच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन आदळली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक घडली. अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सप्तश्रुंगी घाटामध्ये बसचे ब्रेक फेल होऊन एसटी घाटात कोसळली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका बसचा अपघात झाला आहे. या बसमधून एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. मुक्ताईनगर आगाराची एमएच 20 बीएल 1770 या क्रमांकाची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.
हे प्रवासी झाले जखमी
या अपघातामध्ये प्रतीक्षा सुनील झांबरे ( 22 रा. आळंद ), समाधान उखर्डु तायडे ( 69 रा. मानेगाव ), कमल गोविंदा पवार ( 59 रा. वढोदा ), जानकोर त्र्यंबक महाले ( 75 रा. वढोदा), नलीनी भास्कर न्हावी ( 70, रा. वढोदा), अनुराधा पाटील ( 35 मेळसांगवे), कस्तुराबाई भोलणकर ( 70 रा. शिरसोली), सपना विनोद पाटील ( 27 रा. जामनेर), सार्थक विनोद पाटील (2, रा. जामनेर) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले.