सातारा – सकल मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढ्यास यश आल्यानंतर साताऱ्यात मराठा समाजाच्यावतीने जिलेबी वाटून जल्लोष करण्यात आला. येथे पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून व अधिसूचनेची प्रत छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केल्यानंतर जय शिवाजी जय भवानी, एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा समाज निघाला होता.
मुंबईच्या वेशीवरच मोर्चा असतानाच राज्य शासनाने जरांगे- पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या. या विजयाचा गुलाल घेऊन साताऱ्यात आलेल्या मराठा समाजाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आनंद साजरा केला. राज्य शासनाच्या अधिसूचनेची प्रत छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून जिलेबीचे वाटप करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले, मराठा आरक्षणाच्या लढाईच्या पहिल्या टप्प्यात मोठा विजय मिळाला आहे. शासनाने समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून आता अधिसूचनेचे रुपांतर अध्यादेशात करण्याची सरकारला सुबुद्धी यावी. तसेच वंशावळीनुसार आरक्षण देताना पितृसत्ताक आणि मातृसत्ताक या दोन्ही आधारे कुणबी दाखले मिळावेत.
या लढाईचा एक टप्पा यशस्वी झाला आहे. सरसकट आरक्षणाचा अध्यादेश मिळून आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहिल, असा निर्धार व्यक्त यावेळी व्यक्त करण्यात आला. मराठा आंदोलकांना मोर्चादरम्यान पाचवड, भुईंज, वेळे, खंडाळा, शिरवळ पुणे, लोणावळा तसेच वाशी येथे मराठा माय- माउलींनी जेवणाची सोय केली. तेथील नागरिकांनी चांगले सहकार्य केल्याचे आवर्जून सांगत मराठा समाजाने याबाबत आभार मानले.