नवी दिल्ली – जहांगिरपुरी हिंसाचार प्रकरणातील एका मुख्य आरोपीला पोलिसांनी आज पश्चिम बंगालमधून अटक केली. फरहीद उर्फ नीतू असे या आरोपीचे नाव आहे. जहांगिरपुरीतील जातीय हिंसाचारामध्ये तो सक्रिय सहभागी झाला होता. या हिंसाचारात त्याने मुख्य जबाबदारी पार पाडली होती. पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आलेल्या विविध पोलीस पथकांनी त्याला आज अटक केली आहे. त्याला तामलुक गावातून त्याच्या आत्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याला विमानाने नवी दिल्लीला आणले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
जहांगिरपुरी येथे जातीय दंगल झाल्यानंतर फरहीद घटनास्थळावरून पळून गेला होता. तेंव्हापासून तो सातत्याने आपला ठावठिकाणा बदलत पश्चिम बंगालमध्येच लपून राहिला होता.फरहीदच्या विरोधात 2010 पासून दरोडा, दागिने हिसकावणे, घरफोडी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत किमान 6 प्रकरणे दाखल आहेत.
जहांगिरपुरी भागातील तो कुख्यात गुन्हेगार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.जहांगिरपुरीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले होते. दगडफेक आणि जाळपोळीदरम्यान अनेक वाहनांचे नुकसानदेखील झाले होते.