रोम – जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र असलेल्या इटलीतील व्हेनिस हे सुंदर शहर संकटात सापडले आहे. तलावांचे शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे. त्याच शहरातील अनेक तलाव सुकू लागल्याने पर्यटन व्यवसायही संकटात आला आहे. व्हेनिस शहरामध्ये तब्बल दीडशे तलाव असून या तलावांच्या माध्यमातूनच तेथे जलवाहतूक चालते याशिवाय जगभरातील पर्यटक केवळ या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी व्हेनिस शहरामध्ये येतात गेल्या काही महिन्यांपासून या सर्व तलावांमधील पाणी आटू लागले आहे आणि अनेक तलावांमध्ये चिखल दिसू लागला आहे.
या चिखलामधून बोटीने किंवा जलवाहतूक करणे अशक्य झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांची रोजीरोटी संकटात आली आहे. जगभरातून दरवर्षी दोन कोटीपेक्षा जास्त पर्यटक केवळ व्हेनिस शहरातील जलसफरीचा आनंद घेण्यासाठी येतात पण गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये या सर्व तलावांमधील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहे. व्हेनिसमधील या तलावांमध्ये ज्या बोटी वापरल्या जातात त्याला गोंडोला असे म्हणतात.
अतिशय छोट्या आकाराच्या या बोटींमधून पर्यटन करणे ही एक आनंदाची बाब असते. या व्यवसायावर हजारो लोक अवलंबून आहेत. अनेक तलावांमधील पाणी पूर्णपणे आटल्याने तिथे फक्त चिखल आहे. त्यामुळे अनेक गोंडोला फक्त भिंतीच्या बाजूने बांधून ठेवण्यात आल्या आहेत. साधारणपणे व्हेनिस शहरातील या तलावांमध्ये जे पाणी येते ते या शहराला लागून असलेल्या दोन नद्या आणि समुद्रातून येते पण गेल्या काही वर्षांमध्ये इटालीतील आणि व्हेनिस शहरातील पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याने त्याचा फटका बसू लागला आहे.
नद्यांचे पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे या तलावात पाणी येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 2022 मध्ये इटालिला सर्वात मोठा दुष्काळाचा तडाखा बसला होता. हा दुष्काळ गेल्या 70 वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ मानण्यात येतो. सर्वच प्रमुख नद्यांचे पाणी कमी झाल्याने तलावांचे पाणीही कमी झाले आहे. अनेक वेळा समुद्राच्या भरतीचा परिणाम होऊन तलावांमध्ये पाणी वाढते पण गेल्या काही कालावधीमध्ये समुद्रातील भरतीची तीव्रताही कमी झाल्याचे तज्ञ सांगतात, त्यामुळे समुद्राचे पाणी पण तलावामध्ये मिसळत नाही.