शिमला -राजकारण म्हणजे काही पार्ट-टाईम जॉब नाही. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला ४ जूनला बॅगा पॅक कराव्या लागतील अन् मुंबईला परतावे लागेल, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे तरूण नेते विक्रमादित्य सिंह यांनी शनिवारी सोडले.
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमादित्य विरूद्ध कंगना अशी लढत होत आहे. विक्रमादित्य यांना अर्थातच कॉंग्रेसने, तर कंगनाला भाजपने उमेदवारी दिली आहे. प्रचार अखेरच्या टप्प्यात आल्याने त्यांच्यातील शाब्दिक युद्ध शिगेला पोहचले आहे. त्यातून विक्रमादित्य यांनी एका मेळाव्यात बोलताना राजकीय क्षेत्रात अतिशय गांभीर्याने कार्य करावे लागत असल्याच्या आशयाची भूमिका मांडली. राजकीय क्षेत्रात दिवस-रात्र जनतेत राहून सेवा करावी लागते. विकासाचे व्हिजन समोर ठेऊन मी जनतेचा कौल मागत आहे.
त्याउलट, केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने कंगना संदर्नहीन मुद्दे उपस्थित करत आहे. ती आपत्ती (कंगना) मुंबईला केव्हा परतेल अशी कुजबूज आता भाजपचे नेतेच करू लागले आहेत, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली. मंडीमध्ये सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात १ जूनला मतदान होईल. त्यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.