पुसेगाव -खाद्याचे दर वाढल्याने खटाव तालुक्यातील शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आले आहेत. एकीकडे शेती उत्पादनातील तोट्यामुळे शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे पाहतो. करोनामुळे जनावरांचा बाजार गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद होते.
मध्यंतरीच्या काळात बाजार सुरू झाले. शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून लॉकडाऊन काळातही आणि त्यानंतर इतरत्र शोध घेऊन, चढ्या भावाने दुभत्या गायी-म्हशी खरेदी करून व्यवसाय सुरू केला; परंतु ऐन महागाईच्या काळत शेतकऱ्यांना आर्थिक चणचण असताना, जनावरांच्या खाद्यांच्या दरांत भरमसाठ वाढ झाल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
खटाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुभती जनावरे खरेदी केली होती. काही दिवसांपासून पशुखाद्य महागल्याने दूध व्यावसायिक शेतकरी अडचणीत आले आहेत. बहुतेक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून भाजीपाला, कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध याकडे आकर्षित होतात. या व्यवसायांवर शेतकऱ्यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, किरकोळ दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलो आहे.
पशुखाद्यांचे भाव असेच वाढत राहिल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडेल.
शेतकरी पशुधन कमी करण्याच्या मार्गावर
खटाव तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. खाद्याचे दर वाढल्याने जनावरे कमी करण्याच्या मार्गावर शेतकरी आहेत. एकीकडे दुधाच्या किमती स्थिर असताना, दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढत आहेत. दूध उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हा व्यवसाय न परवडल्याने शेतकऱ्यांना पशुधन कवडीमोल भावात विकावे लागते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.