नाशिक – “जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे. त्यांच्या बरोबर जाणे म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने आत्मघातकी आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने ते रोज नवीन काहीतरी बोलतात. यावर आवर घातला पाहिजे. मुळात त्यांचे डोकं ठिकाणावर आहे की नाही? हेच कळत नाही? असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधींना अख्खे जग नमन करते. मी अनेक ठिकाणी गेलो, जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. जे त्यांच्यावर गलिच्छ स्वरूपात टीका करतात, त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण कडक कारवाई होत नाही, म्हणून ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलतात. काल ते पंडित नेहरूंचे देशासाठी काही योगदान नाही, असे म्हणाले.
पण त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत वकील, त्यांनी देशासाठी सर्व काही दिले, स्वःत नेहरू साडेअकरा वर्षे तुरुंगात राहिलेत, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करू नका, पण असली टीका मला आवडत नाही. आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात कोर्टात आहे. पण कोर्टात तारीख वेळेवर मिळत नाही, तरीही आम्ही त्याचा पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.
भिडेंच्या वयाला हे शोभत नाही – आठवले
महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना आव्हान देत स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महात्मा गांधी यांच्यावरील वक्तव्य हे संभाजी भिडे यांच्या वयाला शोभणारे नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. यावेळी त्यांनी भिडेंवर कारवाई करण्याचीही मागणी केली. उल्हासनगर कॅम्प चारमधील कुर्ला कॅम्प परिसरातील एका खासगी कार्यक्रमात आठवले बोलत होते.