राजकोट :- सलामीवीर फलंदाज साई सुदर्शनने केलेल्या अफलातून खेळीमुळे शेष भारत संघाचा डाव सावरला. त्याला अन्य फलंदाजांनी उपयुक्त फलंदाजी करत दिलेल्या साथीमुळे शेष भारत संघाने इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत रणजी करंडक विजेत्या सौराष्ट्र संघाविरुद्ध रविवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 8 गडी गमावून 298 अशी समाधानकारक मजल मारली आहे.
शेष भारत संघाचा कर्णधार हनुमा विहारीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर सुदर्शनने मयंक आग्रवाल (32) व कर्णधार विहारी (33) यांच्यासह महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरताना जबाबदारीने फलंदाजी केली.
सुदर्शनने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. तसेच त्याने शतकाकडेही कूच केली होती. मात्र, अनावश्यक फटका खेळून तो 72 धावांवर बाद झाला. त्याने 164 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार फटकावले. त्याला पार्थ भुटने बाद केले. त्यानेच ठरावीक अंतराने शेष भारताच्या फलंदाजांना बाद करत त्यांचा डाव पुन्हा एकदा अडचणीत आणला.
यावेळी श्रीकर भरतने 36, शम्स मुलाणीने 32 धावा करत संघाचा डाव सावरला. खेळ थांबला तेव्हा सौरभ कुमार 30 तर, नवदीप सैनी 8 धावांवर खेळत आहेत. पार्थ भुटने सर्वाधिक 4 गडी बाद केले. युवराजसिंग दोदीया व धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – शेष भारत पहिला डाव – 90 षटकांत 8 बाद 298 धावा. (साई सुदर्शन 72, श्रीकर भरत 36, हनुमा विहारी 33, मयंक आग्रवाल 32, शम्स मुलाणी 32, सौरभ कुमार खेळत आहे 30, नवदीप सैनी खेळत आहे 8, पार्थ भुट 4-85, युवराजसिंग दोदीया 2-74, धर्मेंद्रसिंह जडेजा 2-89)