गाल्हेर :- रणजी करंडकातील चॅम्पियन संघ आणि शेष भारत यांच्यात दरवर्षी खेळला जाणारा इराणी करंडक यावेळीही शेष भारत संघाने आपल्या नावे केला. शेष भारत संघाने इराणी करंडकाच्या अंतिम सामन्यात रणजी 2022 चॅम्पियन मध्य प्रदेशचा तब्बल 238 धावांनी पराभव केला. गतवेळीही शेष भारत संघाने हा करंडक जिंकला होता. शेष भारताकडून पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात झंझावाती शतक झळकाविणारा यशस्वी जैस्वाल सामनावीर ठरला.
शेष भारताचा कर्णधार मयांक अगरवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय सार्थ ठरवत अभिमन्यू इसवरन (154) आणि यशस्वी जैस्वाल (213) यांच्या अप्रतिम खेळीमुळे शेष भारतने पहिल्या डावात 484 धावांचा डोंगर उभारला. यानंतर मध्य प्रदेशच्या यश दुबेने (109) शतक झळकाविताना संघाचा फॉलोऑन पुढे ढकलला.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦! 👏👏
Congratulations to the Rest of India for winning the @mastercardindia #IraniCup 🏆#MPvROI pic.twitter.com/FRbQvvE2sp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 5, 2023
मध्य प्रदेशने पहिल्या डावात 294 धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे शेष भारतला 190 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर जैस्वालने दुसऱ्या डावातही शतक झळकाविले ज्यामुळे शेष भारतने एकूण 246 उभारल्या. अखेरच्या दिवशी 356 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या मध्य प्रदेशचा डाव 198 धावांवर आटोपल्याने शेष भारतने मोठा विजय आपल्या नावे केला.
चार शतके आणि 40 विकेट
इराणी करंडकाच्या या अंतिम सामन्यामध्ये तब्बल चार शतके, 40 विकेट पडल्या. गाल्हेरची खेळपट्टीने वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोन्हीला समान सहाय्य केले. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच बळी घेतले.
Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!
हिमांशूला खराब अंपायरिंगचा फटका
मध्य प्रदेशचा कर्णधार हिमांशू मंत्री (51) याला खराब अंपायरिंगचा फटका बसला. चौथ्या दिवशीच्या धावसंख्येत त्याने अजून एकही धाव जोडली नसताना पंचाने त्याला बाद घोषित केले. रिप्लेमध्ये मात्र चेंडू बॅटला न आदळता यष्टिरक्षकाच्या हातमोजेला लागल्याचे दिसून आले. यानंतर मध्य प्रदेश संघाने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात शतक झळकावणारा यश दुबे मुकेश कुमारच्या एका शानदार चेंडूवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक –
शेष भारत : पहिला डाव : 121 षटकांत सर्वबाद 484;
दुसरा डाव : 71.3 षटकांत सर्वबाद 246;
मध्य प्रदेश : पहिला डाव : 112.5 षटकांत 294.
दुसरा डाव : 58.4 षटकांत सर्वबाद 198(हिमांशू मंत्री 51, हर्ष गवळी 48; सौरभ कुमार 3-60, पुलकीत नारंग 2-27, मुकेश कुमार 2-34)
जैस्वालची विक्रमी कामगिरी
शेष भारतसाठी पहिल्या डावात 213 धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात 144 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे या सामन्यात एकूण 357 धावा करणाऱ्या जैस्वालने सांगितले की, “पहिल्या दिवशी मी विकेट वाचवली असती तर मला त्रिशतक पूर्ण करण्याची संधी होती. ईश्वरननेही सुरेख खेळ करताना मला चांगली साथ दिली.’ या विक्रमी कामगिरीसाठीच 21 वर्षीय जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.