मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातून बीसीसीआयला तब्बल एक हजार कोटींपेक्षाही जास्त कमाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य प्रायोजक असलेल्या टाटा समुहाकडून बीसीसीआयला तब्बल 800 कोटी रुपये मिळणार असून सह प्रायोजकांकडूनही मिळत असलेल्या रकमेची बेरीज करता ही रक्कम तब्बल 1100 कोटी रुपये मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आयपीएलमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात दरवर्षी वाढच होत आहे. आयपीएल स्पर्धेला मोठे प्रायोजक लाभले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या मध्यवर्ती करारातून बीसीसीआयला 800 कोटी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम ठरणार आहे. आयपीएलचा यंदाचा 15 वा मोसम आहे. बीसीसीआयने यंदा मुख्य प्रायोजकम्हणून टाटा समुहाशी करार केला आहे. त्याशिवाय दोन नवीन सह प्रायोजकही मिळाले आहेत.
आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने रु-पे आणि स्विगी इन्स्टामार्ट या कंपन्यांशी नवीन करार केला आहे. हे दोन ब्रॅंड आयपीएलचे दोन नवे ब्रॅंड बनणार असून सध्या बीसीसीआयकडे आयपीएलसाठी एकूण नऊ ब्रॅंड प्रायोजक आहेत. बीसीसीआयने रु-पे बरोबर 42 कोटी आणि स्विगी इन्स्टामार्ट बरोबर 44 कोटी रुपयांचा वार्षिक करार केला आहे. आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकांनी संख्या वाढत असून मुख्य प्रायोजकतेत वाढ झाल्यामुळे बीसीसीआय यंदाच्या स्पर्देतून 1100 कोटी रुपयांची कमाई करेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 संघ खेळणार आहेत.
वीवोकडून मिळणार नुकसान भरपाई
वीवो कडून बीसीसीआयला 996 कोटी रुपये मिळणार होते. वीवोने दोन्ही मोसमांसाठी 484 आणि 512 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. याआधी एका मोसमासाठी 440 कोटी रुपये अपेक्षित होते. आता टाटा समुह या हक्कांसाठी दोन मोसमांच्या कराराचे प्रत्येकी 335 कोटी रुपये देणार आहे. करार रद्द केल्यामुळे वीवोकडून बीसीसीआयला 450 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहेत.