मुंबई :- सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल स्पर्धेत 150 बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा भुवनेश्वर हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 150 पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू व वेगवान गोलंदाज लसित मलिंगा व चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांनी केली आहे.
आयपीएलमध्ये 150 बळींचा टप्पा गाठणारा भुवनेश्वर एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. हरभजन सिंग, पियुष चावला व अमित मिश्रा यांनी अशी कामगिरी केली आहे. अर्थात ते आता आयपीएल स्पर्धेचा भाग नसल्याने त्यांना मागे टाकण्याची संधी भुवनेश्वरला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही ही कामगिरी करण्याची संधी आहे. अश्विनने 167 सामन्यांत 145 बळी घेतले आहेत.
2016 सालच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या विजेतेपदात भुवनेश्वर कुमारचा मोठा वाटा होता. भुवनेश्वरने त्या मोसमात 23 बळी घेतले होते. यानंतर 2017 सालच्या मोसमात त्याने 26 बळी घेतले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत दुखापतींमुळे त्याची आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खालावली आहे. 2021 साली त्याला 11 सामन्यांत केवळ 6 बळी घेता आले. त्याला आयपीएल 2022 सालच्या लिलावात 4.20 कोटी रुपयांना हैदराबादने खरेदी केले होते.
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख भार भुवनेश्वरने अनेक वर्षे वाहला आहे. मात्र, सततच्या दुखापतींमुळे त्याचे संघातील स्थान कायम अनिश्चित असते. मात्र, यंदाच्या मोसमात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल स्पर्धेतही दुखापतींना टाळण्यात यश मिळवले आहे. आता या स्पर्धेत तो आणखी किती बळी घेणार याकडे लक्ष लागणार असून हैदराबाद संघाचे यशही त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून राहणार आहे.
पॉवरप्लेमध्ये
सर्वात यशस्वी
पॉवरप्लेमध्ये भुवनेश्वर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. पॉवरप्ले षटकांत त्याने जहीर खान आणि संदीप शर्मा यांना मागे टाकत 53 बळी मिळवले आहेत. जहीर व संदीप सिंग आता या स्पर्धेत खेळत नसल्यामुळे भुवनेश्वरची कामगिरी आता कोण मागे टाकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.