मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन सुद्धा संपावर गेलेले कर्मचारी आपल्या भूमिकेवर कायम असल्यामुळे प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
नुकत्याच नामांतर झालेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी जिल्ह्यात संपावर गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये संपावर गेलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवारपासून (14 मार्च) संप पुकारला आहे.
या संपाला विरोधी पक्षांनी पाठिंबा देत राज्यसरकावर टीका केली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर करताना सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही सरकारी कर्मचारी निर्णय होईपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
तोडगा काढण्यासाठी समिती –
मुख्यमंत्री शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेवर तोडगा काढण्यासाठी समिती नेमल्याची माहिती विधानसभेत दिली. या समितीत सेवा निवृत्त आयएएस अधिकारी सबोधकुमार, के पी बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्त हे या समितीचे सदस्य असतील, तर संचालक लेखा व कोषागरे हे समितीचे सचिव असतील आणि ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जुनी पेन्शन लागू केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार ही समिती करेल. तसेच केंद्र शासनाची निवृत्ती वेतन योजनेचाही अभ्यास ही समिती करेल. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची माघार –
राज्यभर सर्वत्र संप चालू असताना सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मात्र या संपातून माघार घेतली आहे. संप न करता काळ्या फिती लावून काम करीत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्मचारी संघटना कृती समितीने घेतला आहे.
मंगळवारी पहिल्या दिवशी महापालिकेत एकूण 5421 कर्मचाऱ्यांपैकी 3465 कर्मचारी संपावर होते. त्यामुळे पालिका प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी संपकरी कर्मचाऱ्यांनी पवित्रा बदलल्याचे दिसून आले. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, कर वसुली आदी विभागांचे कामकाज सुरू झाले आहे.