गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यात होतो. त्यावेळी तिथल्या कणेरी मठाला भेट दिली. तिथ फार सुंदर शिल्प आहेत. प्रवेशद्वारापासून काही भाग जणू पुराणकाळातल्या गुहेसारखा आहे. केवळ व्यास, वाल्मिकी नव्हे तर आयुर्वेद, खगोलशास्त्र, योग, भौतिक व रसायन अशा अनेक क्षेत्रात आपल्या संस्कृतीतल्या ऋषी मुनींनी किती खोल अभ्यास केला होता त्याच्या घटना प्रसंग आणि जणू त्याच व्यक्ती भासाव्यात असे त्यांचे पुतळे आणि गूढ, रम्य, शांत गारव्याचं असं वातावरण. रामायण, महाभारतातील कथा तर प्रत्येकालाच माहिती असतात. पण पाणिनी, कणाद, पतंजली, भास्कराचार्य, वराहमिहीर, भगीरथ, सुश्रुत अशा अनेक महानऋषींची शिल्प तिथं होती. त्यांच्याविषयीची माहितीही शेजारीच लिखित स्वरुपात होती.
संस्कृत व्याकरणाचा अभ्यास मांडणारा पाणिनी, कणांचा (ऍटम) शोध लावणारा कणाद, योग संस्कृत व आयुर्वेद या तिन्हीचा अभ्यास असणारे पतंजली, विख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य, अनेक तारे व ग्रहांचा शोध दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी लावणारा वराहमिहीर, हजारो वर्षे पुन्हा पुन्हा तप व प्रयत्न करून स्वर्गीची गंगा अगोदर पृथ्वीवर व नंतर पाताळात नेणारा भगीरथ राजा, हजारो वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करणारा सुश्रुत अशा जवळपास सगळ्याच व्यक्तींची माहिती तिथे होती. मला ती वाचावीच लागली नाही. उलट माझा मुलगा आणि आमचा ड्रायव्हर यांना मीच अजून माहिती देत होतो ते अवाक झाले. नंतर माझ्याच ध्यानी आले की एवढं असून मला फक्त पुस्तकी माहितीच आहे. ज्ञान कुठाय?
ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्यातून जी माहिती वापरली जाते ती ज्ञान होते. मग एवढ्या क्षेत्राची नुसती माहिती तोंडपाठ असून उपयोग काय?
फार तर चंद्र, मंगळ, शुक्र, सप्तर्षी हे पाहिले आहेत, दोन चार उपाय रुग्णांना सांगितले आहेत पण गणित, भौतिक, रसायन, संस्कृत, राजकारण या इतर विषयांचे काय? अगदी सांगण्या शिकवण्याइतका किंवा तपशीलवार लेख लिहिण्याइतका अभ्यास आपण केलेलाच नाही मुळी! मग आपल्याला फार ज्ञान आहे, आपण जणू जगातले एकमेव सर्वज्ञ गुरू आहोत असा अहंकार मात्र आपल्याला का असतो? चोवीस तास टीव्हीवर न्यूज चॅनेल सुरू असतात. आपल्याला सगळं (म्हणजे राजकारण, सिनेमा, क्रिकेट) याचं ज्ञान (म्हणजे माहिती) असते. पण म्हसवंड, मंगरुळ, पेठवडगाव, साकोली अशा नावाच्या गावांना काय चाललंय हे जरी समजलं तरी त्यानं आपल्या ज्ञानात कितीशी भर पडते?
आपले डोळे आपल्या मेंदूला सतत माहिती पुरवतात. तसेच कर्णेंद्रियही विविध आवाज ऐकतं. पण मेंदू यातली नेमकी व निवडक माहिती स्वीकारतो. पूर्वी तीन महिने लागत ती माहिती मिळायला आता आपल्याला एक दिवसात मिळते. काही मेंदूत साठते तर बरीचशी उडूनच जाते आणि आपल्याला कामाला तर फक्त 10-12 तासच मिळतात. मग त्या माहितीचे रुपांतर ज्ञानात करणार तरी कधी आणि कसं?
मोठमोठे शास्त्रज्ञ, मुत्सद्दी कलाकार, विचारवंत अभ्यासल्यावर हे समजतं की, आपण आणि आपली बुद्धी किती तोकडी आहे? मध्यंतरी अमेरिकेने सोडलेल्या एका यानानं आपलं सूर्यमंडल भेदून दुसऱ्या सूर्यमंडलात प्रवेश केला अशी बातमी वृत्तपत्रात वाचली. ते यान सोडल्याला जवळपास 40 वर्षे झाली. मग हे विश्व किती मोठं असेल?
या सगळ्या अफाट माहितीतून होणारे ज्ञान आणि त्यानंतर होणारे सत्यदर्शन यात सांगड घालायची. अर्थात फार थोड्यांना हे जमतं. लाखो-अब्जावधी लोक तसेच आयुष्याच्या शेवटाला जातात. म्हणूनच हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माची कल्पना आहे.
या अचाट जगात आपल्या काही कल्पना उरलेल्या असतात आणि काही पूर्ण होताना इतरांना त्याचा त्रास होतो किंवा उपयोग होतो. पण काहीही झालं तरी परिणाम होतोच. सध्यातर माहितीचा स्फोट झाला आहे. जवळजवळ सगळेजण त्यालाच ज्ञान समजत आहेत. पण माहितीचं ज्ञानात आणि नंतर सत्यदर्शनात रुपांतर व्हावं असे प्रयत्न काहीजण करत आहेत. प्रत्येकाचीच धडपड सत्य मिळवण्याची, ते शोधण्याची असायला हवी. ती जाणीवपूर्वकच करावी लागते. तशी धडपड जे करू इच्छितात त्याचं अभिनंदन!
सहजानंद