आवक वाढल्याने प्रतिडाग तीन हजार रुपयांचा फटका : थंडीमुळे पान उत्पादक गारठले
पळसदेव – इंदापूर तालुक्यातील पानमळ्याला दरघटीचा फटका बसत आहे. तीन महिन्यांपूर्वी साध्या आणि फाफडा पानाचे दुप्पट भाव होते. सध्या हेच भाव निम्म्यावर येऊन ठेपले आहेत. प्रति डाग अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयांचा फटका बसला आहे. सध्या थंडीमुळे पाने लवकर सुकत असल्यामुळे खुडणीची कामे करीत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत एकाचवेळी पानाची आवक झाल्यामुळे दर ढासळले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी अवकाळीचा फटका पानमळ्याला बसला होता. त्यावेळी अनेक उत्पादकांचे नुकसान झाले होते. सध्या थंडीमुळे पाने लवकरच सुकत आहेत. त्यामुळे शेतकरी लवकर पानाची खुडणी करीत आहेत. साध्या पानाचा प्रति एक डाग दर अडीच हजार रुपयांच्या घरात आहे. फाफडा पानाचा दर तीन हजारांपर्यंत गेला आहे. पानमळ्यावर दरघटीची संक्रात आली आहे. कामगार तुटवडा, बदलते हवामान व बेभरोशी बाजारभाव आदी कारणांमुळे शेतकरी वैतागून गेला आहे.
त्यामुळे पानमळे तोडून टाकले जात आहेत. इंदापूर तालुक्यातील पानमळा राज्यात प्रसिद्ध आहे. सध्या तालुक्यात काही गावांतील ठराविक शेतकऱ्यांकडे पानमळेच शिल्लक राहिले आहेत. भविष्यात एकही पानमळा शिल्लक राहणार नाही, याची शक्यता आहे. पानमळ्याला लागवडीपूर्वी एकरी मशागत, वाफे, त्यात शेवगा पिकाची लागवड, यासाठी 30 ते 35 हजार खर्च येतो. 2 महिन्यानंतर वेलीसाठी 10 ते 12 रुपये प्रति वेल याप्रमाणे एकरी 7 हजार वेळी लागतात. प्रथम तीन महिन्याला बांधणी, नंतर दोन महिन्याला बांधणी करावी लागते. प्रति बांधणी 10 ते 15 हजार रुपये खर्च येत आहे. वर्षाकाठी 7 ते 8 बांधणी होतात. त्यानुसार 70 ते 80 हजार खर्च येतो. खताचा खर्च एकरी चार ट्रेलर आहे. यासाठी 40 ते 45 हजार रुपये खर्च आहे. तोडणी व बांधणीला प्रति डाग 500 रुपये येत आहे. एकूण खर्च दोन ते अडीच लाख रुपये येत आहे. सर्व खर्च वजावट करता तीन लाखांचे उत्पन्न मिळते.
थंडीमुळे पानाची परिपक्वता वाढली
तीन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने पानमळ्यात मूळकुजव्यासारखा रोग आला आहे. त्यामुळे नागवेलीची मुळेच कुजत आहेत. अनेकवेळा पाने जाळून जात असल्याचे चित्र पानमळ्यात दिसत आहे. सध्या थंडीमुळे पाने लवकर पिकत आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात पानांची खुडणी करीत आहेत. त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. आवक वाढली आहे.
त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरात निमगाव केतकीची पाने विक्रीसाठी जात आहेत. मागणी आणि पुरवठा यात असमतोलपणा येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत झोडपून काढले आहे. सध्या उत्पादित पाने मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने पानाचा बाजारभाव गडगडला आहे. अगदी खर्च काढणे देखील मुश्किल झाले आहे.
20 दिवसांपूर्वीच खुडणीला सुरुवात
दरवर्षी पानमळा शेतकरी मकरसंक्रांतीनंतर पानमळ्यात उतरण करतात. मात्र, थंडीमुळे शेतकरी अधिकाधिक पाने खुडण्याचे काम करीत आहे. मोठ्या प्रमाणात सध्या पानाची आवक झाली आहे. आवकेचा दरावर परिणाम झाला आहे. हाच बाजारभाव निमगाव केतकी, पुणेसह श्रीरामपूर आदी बाजारपेठेत देखील दर उतरले आहेत. दरवर्षीच्या अनुभवानुसार मकरसंक्रांतीनंतर पानाला चांगला बाजारभाव वाढतो. मात्र, सध्या उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.