बीजिंग – भारत आणि चीनदरम्यानचे द्विपक्षीय संबंध गेल्या काही वर्षांमध्ये बिघडलेले आहेत, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग वी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील सीमाविषयक वाद मिटवण्यासाठी समर्पक प्रयत्न केले जायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चीनच्या संसदेच्या परिसरात परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही गट भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, असेही वॅंग यानी सांगितले.
दोन्ही देशांमधील सीमावाद इतिहासकालापासून सुरू आहे. चीनकडून नेहमीच समर्पक प्रयत्नांच्या आधारे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या प्रयत्नांचा दिविपक्षाय संबंधांवर व्यापक अर्थाने कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही, याची काळजी चीनकडून घेतली जात असते.भारत आणि चीन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असण्यापेक्षा एकमेकांचे भागीदार असले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
भारतीय सीमेच्या हद्दीमध्ये सैन्य न आणण्याबाबतच्या कराराचे चीनकडून उल्लंघन झाले. त्यानंतर भारताचे चीनबरोबरचे संबंध सध्या एका अवघड अवस्थेतून जात आहेत, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अलिकडेच म्हणाले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारताचे चीनबरोबरचे संबंध अडचणीचे झाले असल्याचे जयशंकर म्युनिक येथील संरक्षण परिषदेच्या निमित्ताने म्हणाले होते.