नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्या संदर्भात इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांची आज होणारी बैठक रद्द झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडीच्या निमंत्रक पदाबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार होता आणि नितीश यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार होती.
मात्र आता बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठक नक्की कधी होणार हे अद्याप ठरले नसल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे तर याचवरून भारतीय जनता पार्टीने इंडियावर निशाणा साधला आहे.
इंडियाची बैठक टळली नाहीतर टाळली गेली आहे. इंडियाचे नेते नितीश कुमार यांना केवळ स्वप्न दाखवत आहेत. नितीश यांचा बिहारमधील जनाधार संपुष्टात आला असून कोणालाही आता नितीश कुमार नको आहेत, इंडिया आघाडीतील नेत्यांनाही ते नको आहेत असे भारतीय जनता पार्टीचे नेते संजय मयुख यांनी म्हटले आहे.
भाजपच्या नेत्यांनी काहीही टीका केली असली तरी देशाच्या हिंदी भाषिक पट्ट्यातील एक प्रभावी चेहरा म्हणून नितीश यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी अगोदर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याशी आळीपाळीने आघाडी केलेली आहे. भाजपशी त्यांनी काही महिन्यांपूर्वीची आपली सोयरीक तोडून पुन्हा राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केला आहे आणि या पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव याच्या साथीने पुन्हा विरोधकांच्या आघाडीची जुळवाजुळव केली.
त्यामुळे इंडिया आघाडीचे खरे सूत्रधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विरोधात असलेल्या सगळ्याच पक्षांना त्यांनी एका मंचावर आणले ही त्यांची खरेतर कमालच आहे आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही ही त्यांची आणखी एक जमेची बाजू.
कॉंग्रेसवर केली होती टीका
गेल्याच आठवड्यात संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेची आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत नितीश यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर कॉंग्रेसवरच टीका केली होती. त्यांच्या या थेट हल्ल्यानंतर कॉंग्रेसही सावध झाली आणि इंडियात नितीश यांना महत्वाची जबाबदारी देण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नितीश यांनी पुन्हा कोणते वेगळे पाऊल उचलू नये अशी कॉंग्रेसची इच्छा आहे आणि याबाबत त्या पक्षाला धास्तीही असल्यामुळे नितीश यांच्यासाठी प्रसंगी थोडी माघार घेण्याची तयारीही कॉंग्रेसने केली असल्यामुळे आजच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र बैठकच टळल्यामुळे या पदाची नितीश यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.