जिनिव्हा: देवी आणि पोलिओसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेल्या भारतामध्ये कोरोना विषाणूच्या नियंत्रणाची मोठी क्षमता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 लाख जणांना याची बाधा झाली आहे. भारत हा लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र भारतामध्ये या आरोग्य समस्येचे गंभीर परिणाम दिसून येणार नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी म्हटले आहे.
“पोलिओ आणि देवी हे “सायलंट किलर’ नष्ट करण्याच्या मोहिमेमध्ये भारताने जगाचे नेतृत्व केले आहे. भारतामधून देवी आणि पोलिओचे समूळ उच्चाटन केले आहे. ही जगाला दिलेली मोठी भेट आहे. भारतामध्ये रोगनिर्मूलन करण्याची मोठी क्षमता आहे. भारतासारख्या देशाने हे रोगनिर्मूलन कसे करायचे हे जगाला दाखवून दिले पाहिजे, असे रेयान यांनी म्हटले आहे.
पोलिओ आणि देवीसारख्या रोगाने एकेकाळी भारतात बऱ्याच लोकांचा जीव घेतला होता, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्वही आले होते. या रोगांचे आता भारतातून समूळ झाले आहे. 2014 मध्ये भारताला पोलिओमुक्त दर्जा मिळाला होता, तर 1977 मध्ये या देशाने देवी रोगाचे उच्चाटन केले होते.