पोचेफस्टोर्म – भारताच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने रविवारी 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. आयसीसीने सुरू केलल्या या पहिल्याच स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्याचा आनंद तर आहेच परंतू ही तर नव्या युगाची सुरूवात आहे, अशा शब्दात भारतीय संघाची कर्णधार शफाली वर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय महिला क्रिकेट प्रगत होत असल्याचीच ही नांदी आहे येत्या काळात याच यशाची पुनरावृत्ती वरिष्ठ संघाकडूनही व्हावी यासाठी आम्ही सगळ्या खेळाडू सज्ज आहोत, असा निर्धारही शफालीने बोलून दाखवला.
रविवारी इंग्लंडला अंतिम सामन्यात अवघ्या 68 धावांवर रोखत भारतीय संघाने 7 गडी राखून विजय प्राप्त करत पहिलाच विश्वकरंडक उंचावला. आता ही सुरूवात आहे, थांबायचे नाही व आणखी सातत्यपूर्ण यश मिळवत राहायचे हेच आमचे लक्ष्य आहे. जी कामगिरी 19 वर्षांखालील संघाने केली तीच आता वरिष्ठ संघाकडूनही झाली पाहीजे तरच आमची गुणवत्ता जागतिक स्तरावर सिद्ध होइल. या यशाचा आम्हाला खूप आनंद झाला आहे मात्र, त्यामुळे हुरळून जाणार नसून जास्त सराव करत तसेच जास्तीत जास्त स्पर्धा खेळून हे यश खणखणीत असल्याचे सिद्ध करु, असेही शफाली म्हणाली.
19 वर्षांखालील संघाकडून वरिष्ठ संघाला चांगला सेकंड बेंच मिळाला आहे हेच या स्पर्धेने दाखवून दिले. पार्शवी चौप्रा, तितास साधू, सौम्या तिवारी या व अशा कितीतरी गुणवान खेळाडू समोर आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात वरिष्ठ संघही असेच यश मिळवेल असा मला विश्वास आहे. या स्पर्धेत आम्ही प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार करत होतो. कोणावरही दडपण टाकले जात नव्हते. सगळ्याच खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहित करत होतो त्याचाच लाभ झाला, असेही शफाली म्हणाली.
नुशीनमुळे स्वप्नपूर्ती
2005 साली नुशीन अल खादीर ही भारतीय संघाकडून खेळत होती. त्यावेळीही भारतीय महिला संघ वरिष्ठ गटात विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा नुशीन 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाची प्रशिक्षक होती. त्यावेळी विश्वकरंडक उंचावण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न तीने प्रशिक्षक या नात्याने पूर्ण केले. तीने केलेल्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचेही कर्णधार शफालीने सांगितले.
शफालीची धोनीशी बरोबरी
भारतीय पुरुष टी-20 संघाने आयसीसीच्या पहिल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे 2007 साली विजेतेपद पटकावले होते. यंदा शफालीच्या नेतृत्वात 19 वर्षांखालील गटात पहिल्यांदाच सुरू झालेल्या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय महिला संघाने मिळवले व एकप्रकारे शफालीने धोनीशीच बरोबरी केली.
बीसीसीआयकडून पाच कोटींचे बक्षिस
भारतीय मुलींनी मिळवलेल्या यशानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संपूर्ण संघ व सपोर्ट स्टाफला पाच कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. मुलींनी संपूर्ण देशाला गौरव वाटेल अशी कामगिरी केली आहे व बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संघाचे कौतुक केले आहे.
अविश्वसनिय कामगिरी – द्रविड
भारताच्या मुलींनी जग जिंकले. त्यांनी मिळवलेले यश अविश्वसनिय आमि अभिमानास्पद आहे. अशीच यशस्वी वाटचाल कायर राहो.
आम्हाला तूमचा अभिमान आहे – मिताली
विश्वकरंडक विजयाने देशवासियांना तूम्ही खूप मोठा आनंद दिलात भारतीय संघाकडून खेळण्याचे जसे मला भाग्य लाभले तसेच तुम्हालाही लाभले आहे. तूम्ही मिळवलेल्या यशाचा अभिमान आहे.
पुढील पीढीही प्रेरणा घेईल – सचिन
भारताच्या 19 वर्षांखालील मुलींनी विश्वकरंडक जिंकला हे केवळ एका वाक्यात सांगण्यासारखे यश नव्हे तर त्यामुळे पुढील पीढीही प्रेरणा घेत भारताला असेच यश सातत्याने मिळवून देइल.