पालेकेल्ले – रेणुका सिंगची भेदक गोलंदाजी व स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताच्या महिला संघाचे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला व 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या महिला संघाने यापूर्वी झालेल्या टी-20 मालिकेचेही विजेतेपद मिळवले होते.
सोमवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत रेणुका सिंगच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव 50 षटकांत 173 धावांवर संपला. त्यांच्याकडून अमा कंचनाने सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या. नीलाक्षी डीसिल्व्हाने 32, चामरी अटापट्टूने 27 तर अनुष्का संजीवनीने 25 धावा केल्या. रेणुका सिंगने 28 धावांत 4 बळी घेतले. मेघना सिंग व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना भारताच्या स्टार फलंदाज स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी सहजसुंदर फलंदाजी केली. या दोघींनी श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाला संधीच दिली नाही. त्यांनी 26 व्या षटकात भारताचा एकही बळी न गमावता 174 धावांची अखंडित भागीदारी व सलामी देत विजय साकार केला.
जास्त स्ट्राइक मिळाली नाही म्हणून स्मृतीचे शतक मात्र पूर्ण होऊ शकले नाही. ती 94 धावांवर नाबाद राहिली. या खेळीत तिने 83 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 1 षटकार फटकावला. तिला सुरेख साथ देताना शेफालीनेही तडाखेबंद नाबाद 71 धावांची खेळी करताना 71 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला. या जोडीने दिलेली 174 धावांची सलामी भारतीय महिला संघाच्या आजवरच्या सामन्यांतील सर्वोत्तम व विक्रमी ठरली. आता याच दोन संघात अखेरचा एकदिवसीय सामना येत्या गुरुवारी होणार असून, निर्विवाद वर्चस्वाची भारतीय संघाला संधी आहे.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 50 षटकांत सर्वबाद 171 धावा. (नीलाक्षी डीसिल्व्हा 32, चामरी अटापट्टू 27, अनुष्का संजीवनी 25, अमा कंचना नाबाद 47, रेणुका सिंग 4-28, दीप्ती शर्मा 2-30, मेघना सिंग 2-43). भारत – 25.4 षटकांत बिनबाद 174 धावा. (स्मृती मानधना नाबाद 94, शेफाली वर्मा नाबाद 71).