मुंबई – अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर याची गोलंदाजीच सध्या भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. कारकिर्दीत इतकी सुमार कामगिरी त्याने यापूर्वी कधीही केल्याचे स्मरणात नाही. मग आताच असे काय घडले की, त्याची लय, दिशा व टप्पाच हरवला आहे. विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर असताना त्याच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील अखेरच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याने 19 वे षटक टाकताना 16 धावा दिल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठे लक्ष्यही सहज पार केले.
खेळपट्टीवर तसेच संपूर्ण मैदानातही खूप दव नव्हते. क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजाना बोटे कोरडी करण्यासाठी रुमाल वापरताना पाहिले नाही. त्यामुळे दव जास्त असल्याने चेंडू ग्रीप करता येत नव्हता असे कारण पटत नाही.
भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला जातो तेव्हा विरोधी संघ प्रत्येक वेळी धावा काढतो. हे पाकिस्तान, श्रीलंका व आता ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांविरुद्धच्या सामन्यांत दिसले. त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली पाहिजे अन्यथा विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद हे दिवास्वप्नच ठरेल, असेही गावसकर म्हणाले.