चार डिसेंबर हा भारतीय नौसेना दिन म्हणून मानला जातो. आपल्या संरक्षण व्यवस्थेतले सर्वच सैनिक, अधिकारी हे त्यांच्या जीवनातला उमेदीचा काळ आपल्या देशाचे, भारतीय जनतेचे संरक्षण करण्यासाठी वेचतात आणि म्हणून आपण भारतात कुठेही असलो तरी आपल्या भारतीय सैन्यावर विश्वास टाकून निश्चिंतपणे आपापले व्यवहार करीत असतो. व्यापारी जहाजांना समुद्री चाच्यापांसून बचाव करून सुरक्षितपणे अरबी समुद्रापर्यंत पोचवण्याचंही कामही भारतीय नौदल करीत असते. इतकेच काय, कित्येकदा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या जिवाचीसुद्धा आपल्या सैन्याने काळजी घेतली आहे. त्यांची संकटातून सुटका केली आहे.
2015 साली येमेनमधे प्रचंड हिंसाचार चालू होता. सौदी अरेबियाशी संगनमत करून काही दहशतवाद्यांनी हवाई हल्ले करून तिथे नागरी युद्ध पेटवून दिलं होतं. सौदी हवाई दलाच्या वादळी वेगाने जाणाऱ्या विमानांनी येमेनमधे बॉम्ब्स टाकणं सुरू केलं होतं. त्याच सुमारास भारतीय नौदलाच्या पहाऱ्याचं काम करणाऱ्या आयएनएस सुमित्रा ह्या बोटीच्या कप्तानपदाची सूत्रं कमांडर मोकाशी यांनी हाती घेतली. आणि लगेचच त्यांच्यावर येमेनमधे अडकलेले भारतीय नागरीक एडन बंदरातून सुरक्षितपणे भारतात आणण्याची कामगिरी सोपवली गेली.
आठ कमांडोज, प्रशिक्षित कर्मचारी, खाण्यापिण्याचे पदार्थ, शस्त्रास्त्रं आणि दोन लहान बोटी घेऊन, बोटीत भरपूर इंधन भरून घेऊन आयएनएस सुमित्रा एडनच्या दिशेनं रवाना झाली. समुद्री चाचे, येमेनमधले बॉम्बहल्ले यांना तोंड देत ते एडनला पोचले; तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, 45 मिनिटात तुमचे काम आटपून निघा. बंदरावर स्त्री-पुरुष, बालकं, वयस्क लोक… सगळ्यांची गर्दी! बोटीत घेण्यापूर्वी प्रत्येकाची नीट तपासणी करणं आवश्यक होतं. भारतीय नागरीक असल्याची कागदपत्रं पहायची होती. कदाचित एखादा दहशतवादी या गर्दीत घुसून सर्वांचे प्राण धोक्यात येणं अशक्य नव्हतं. भारताकडूनही शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडण्याच्या सूचना येत होत्या. तशातही डोकं शांत ठेवून आपल्या बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी कामास सुरुवात केली. दीडशे लोकांचीच व्यवस्था असणाऱ्या बोटीमधे आणखी साडेतीनशे नागरिकांना नव्याने सामावून घेतलं. बोटीवरील सैनिकांनी स्त्रियांना शांत, सुरक्षित वाटेल अशी काळजी घेतली. वयस्क, आजारी लोकांना धीर दिलासा दिला. 1 एप्रिल 2015 रोजी सकाळी सात वाजता आयएनएस सुमित्रा दिबोईच्या बंदरावर पोचली. सुखरूप सुटका होऊन एडनहून परतलेल्या साडेतीनशे भारतीयांचं जोरदार स्वागत झालं.
“रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ ही ओळ भारतीय सैन्याच्या बाबतीत शब्दशः खरी आहे. कारण भारतात आल्यावर लगेचच नवीन मोहिमेवर जाण्यासाठी बोटीत इंधन आणि खाद्यपदार्थांसह इतर सामान भरलं गेलं. त्यासाठी जेवढा वेळ लागला, तेवढाच वेळ बोटीवरील कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळाली. त्यानंतर लगेचच कमांडर मोकाशी आपले कर्मचारी आणि सुसज्ज जहाज घेऊन अल-हुदेदा बंदराकडे निघाले. येमेनमधल्या थबेट बंधूंच्या बलाढ्य उद्योगसमूहाच्या एक डेअरीवर बॉम्बवर्षाव करण्यात आल्यामुळे तो भाग अक्षरशः जळत होता. मार्गदर्शनाचा अभाव, बंदर आधीच बंडखोरांच्या ताब्यात गेलेलं, आजूबाजूचा छोटा परिसर … अशा कठीण परिस्थितीत आयएनएस सुमित्रा ही बोट दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन एप्रिलला दुपारी बंदरात पोचली. भर उजेडात अशी कारवाई करणे आणखीच धोक्याचे होते. कारण वरून शत्रू सहज आपला वेध घेऊ शकतो. पण दिवसाउजेडीच काम करावे, असा तिथे गेलेल्या सैनिकांना, आपल्या भारतीय वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांचा हुकूम होता.
जगातला सगळ्यात भयानक आणि धोकादायक प्रदेश बनला होता तो त्या वेळी. हवाई हल्ले चालू होते, आजूबाजूला बॉम्ब पडत होते. बोटीतले सर्वजण युद्धसुद्धा करावे लागेल अशा तयारीत होते. अशातच कर्मचाऱ्यांनी भराभर साडेतीनशे कर्मचाऱ्यांना बोटीत चढवलं. क्लीअर कागदपत्रं असल्याशिवाय कोणालाही बोटीत घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद असताना एक बाई तिच्या सात मुलांना घेऊन बोटीत चढली. तिची एकटीची कागदपत्रं होती. मुलांची नव्हती. माणुसकीच्या नात्यानं तिथल्या तिथं निर्णय घेऊन त्या आठहीजणांना सैनिकांनी बोटीवर घेतलं. आणि एक नवंच संकट समोर उभं राहिलं.
येमेनमधल्या बंडखोरांनी आयएनएस सुमित्रा बोट बंदराबाहेर नेण्यास मनाई केली. इकडून भारतातून तर वारंवार संदेश येत होते की, लवकरात लवकर तिथून बाहेर पडा. अखेरीस गडद काळोखातून जहाजानं मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. हळूहळू उध्वस्त झालेलं शहर, बंदर मागे पडलं. दमलेभागले प्रवासी थोड्यात वेळात झोपून गेले पण मुलांना नवीन ठिकाणी आल्यामुळं उत्साह आला होता. ते बोटीवर भरपूर खेळत होते आणि त्यांची काळजी आपले सैनिक घेत होते. झोपेला आल्यावर त्यांना पालकांकडे सोपवण्यात आलं. वीस तासांचा प्रवास करून आयएनएस सुमित्रा बोट तीनशे सतरा प्रवाशांना घेऊन सुखरूप दिबोईत पोचली.
पोचल्याबरोबर सर्व सैनिकांना सर्वाधिक कठीण बंदर मुकला इकडे जाण्याच्या सूचना मिळाल्या. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी या भागात युद्धच पुकारले होते. बॉम्बवर्षावात इमारती उध्वस्त होत होत्या, माणसं मारली जात होती. भरवेगात जहाज चालवूनही कमांडर मोकाशी आणि त्यांचे कर्मचारी ह्यांना अल मुकलाला पोचायला जवळजवळ चाळीस तास लागले. मात्र बोट धक्क्याला कशी लावावी हा प्रश्न होता. बंदर दहशतवाद्यांनी ताब्यात घेऊन बंद करून टाकलं होतं. या बंदराविषयी, परिसराविषयी, शत्रूविषयी काहीही माहिती ह्या वेळी गुप्तहेर खात्याकडून आपल्या सैनिकांना मिळालेली नव्हती. पण म्हणून ते आपलं कर्तव्य बजावण्यात कसूर करणार नव्हते.
बोट किनाऱ्यापासून काहीशी दूरच उभी करावी लागली. अडकलेल्या भारतीयांना छोट्या बोटींमधून समुद्रात उभ्या असलेल्या आयएनएस सुमित्रावर चढवण्याचं अत्यंत जोखमीचं काम कमांडर मोकाशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना करणं भाग होतं. समुद्रातील काही लहान बोटी आजूबाजूला घुटमळत होत्या. अशाच एका छोट्या बोटीने नुकताच आत्मघातकी हल्ला करून एका मोठ्या बोटीची नासधूस केली होती. पण आपल्या जहाजावरचे कमांडोज अत्यंत सावध होते. आयएनएस सुमित्रा तिथे असण्याच्या काळात त्यांचे बंदुकीच्या चापावरचे बोट क्षणभरसुद्धा हलले नाही. एका लहान बाळासह दोनशे तीन प्रवाशांना घेऊन बोट भारतात परतली.
एवढी कामगिरी पार पडल्यावरच बोटीवरच्या भारतीय सैनिकांना आपल्या कुटुंबियांशी फोनवरून जुजबी का होईना बोलता आलं. आपल्या कामगिरीविषयी बाहेरच्या लोकांशी काहीही बोलण्यास त्यांना परवानगी नसते. यात कुटुंबीयही आले. इतके होऊनही भारताबाहेर संकटात अडकलेल्या आपल्या लोकांची सुटका करण्याची मोहीम अजून संपलेली नव्हती. नऊ आणि पंधरा एप्रिलला जाऊन एकदा 349 आणि एकदा 403 लोकांना आयएनएस सुमित्रा बोटीतून भारतात सुखरूप आणण्यात आले. त्यात काही परदेशी मंडळीही होती. एक पाकिस्तानी जोडपंही होतं! त्यांना आपापल्या देशात पाठवण्यात आलं.
सोळा एप्रिलला शेवटची मोहीम पार पडली आणि त्याच दिवशी त्यांना एडनच्या आखातातल्या चाचेगिरीविरुद्धच्या त्यांच्या कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश मिळाले. मग पुन्हा सर्व सैनिकांनी आपले काम नव्या जोमाने सुरू केले. 2015 सालच्या स्वातंत्र्यदिनी कमांडर मोकाशी यांना “शौर्यचक्र’ जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र ते त्यावर फारसे खूश नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, सर्वांनीच जिवाची बाजी लावून या मोहिमा फत्ते केल्या. तरीही “अतुलनीय साहस, असामान्य शौर्य आणि धाडसी निर्णय घेऊन ते लगेच अंमलात आणण्याची त्यांची क्षमता’ या शब्दात कमांडर मोकाशी यांचा गौरव करण्यात आला. कमांडर मोकाशी काय आणि त्यांचे सर्व सहकारी काय, त्यांना कुणालाच विश्रांती नव्हती, आराम नव्हता, कौडकौतुकाची अपेक्षाही नव्हती. अशा या शूर, पराक्रमी नौदल सेनेस आमचे प्रणाम!
माधुरी तळवलकर