वाई (प्रतिनिधी)- आयुष्यात अनेक सुखदुःख येत राहतात. मात्र, कवितेने माझा हात कधीच सोडला नाही. दैवाने माझ्या कवितेला एवढा सन्मान मिळाला. मात्र, हे सारे घडले नसते तरी देखील मी कविता लिहिणे कधीच सोडले नसते. मी कायमच कविता माझ्यासाठी लिहितो, असे मत प्रतिथयश कवी संदीप खरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त केले.
लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या पंधराव्या पुष्पात ‘मी आणि माझी कविता’ या विषयावर दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी संदीप खरे म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रात काम करताना वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचकाचे डोळे नेहमीच वेगळे दिसतात. प्रत्येकाची लेखन शैली वेगळी असते.
शैली म्हणजे त्या लेखकाच्या नजरेतून भाषेकडे बघणं. कविता लिहिताना आपल्या मनातील आशय कागदावर उतरवण्याची घाई असते. यामध्ये शब्दांना घड्या पडतात, शब्द मुरगळतात आणि वेगळेच शब्द तयार होतात. ‘मी मोर्चा नेला नाही’ या कवितेमध्ये बंड न करणाऱ्या वर्गाची मनस्थिती दाखवायची आहे. इथे अलंकारिक शब्द वापरून माझी भाषिक बुद्धिमत्ता दाखवायची नाही.
कविता लिहिताना माझी नाही तर कवितेची गरज बघितली जाते. कविता एका क्षणात, एका प्रसंगातून सुचत नाही. कविता अनेक प्रसंगांचं, दिवसांचं, कधीकधी संपूर्ण आयुष्याचे संचित असते. ‘कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते’ प्रमाणेच कुण्या काळाची कविता अचानक स्फुरते आणि ती कागदावर उतरते.
अनेक वेळा मला कवितेची व्याख्या विचारली जाते. पण व्याख्येत मावेल ती कविता कसली! ताक घुसळताना अचानक जस लोणी हातात येत तसंच कविता ही अचानकच कधीतरी हातात येते. ‘आयुष्यावर बोलू काही’ या शीर्षकाचे आत्मचरित्रपर पुस्तक काही काळातच रसिकांना द्यायची इच्छा असल्याचे संदीप खरे यांनी सांगितले.
एकदा माझी बायको म्हटली, वेड लागलं, स्पायडरमॅनची बायको म्हटली, पण, सांग सख्या रे, मी अनेक चिंतांनी हे डोके खाजवतो, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, कवितेचा कोपरा अशा अनेक कवितांचं वाचन करून संदीप खरे यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
मुलाखतीचा शेवटही ‘आजी’ या भावविवश करणाऱ्या कवितेने केला. आदित्य चौंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयघोष कद्दू यांच्या स्मृत्यर्थ श्रीमती संजीवनी कद्दू व पाचगणीच्या बिलिमोरिया हायस्कूल यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजन केले.