प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (लडाख) : पूर्व लडाखच्या गालवान आणि फिंगर भागात नजरेला नजर भिडवत आमने सामने आलेल्या भारतीय आणि चिनी फौजांनी शनिवारी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेनंतर दोन पावले माघार घेतली. सुमारे एक ते दोन किमी दोन्ही फौजा मागे सरकल्या आहेत. मात्र, तरीही चिनी सैन्याने 100 रणगाड्यांसह जय्यत तयारी ठेवल्याचे चित्र आहे.
भारत आणि चीनमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खास प्रभातच्या वाचकांसाठी ग्राउंड रिपोर्ट. गलवानमध्ये गस्ती नाका क्र. 14,15 आणि 17 येथून फौजा मागे घेत असल्याचे चित्र आहे. त्याच्या काही निकटच्या भागातूनही फौजामागे घेतल्याचे चित्र आहे. या भागातील स्थितीबाबत दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागातून 20 लॉरी सैन्य चीनने माघारी घेतले आहे. ते आधी आले होते. त्यामुळे ते आधी माघारी गेले.
फिंगर भागातूनही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी काढता पाय घेतला आहे. पीएलए पथके आणि त्यांची वाहने माघारी जात असल्याचे चित्र आहे. या आठवड्यात दोन्ही बाजूकडून गुंतागुंतीच्या विषयांवर चर्चा सुरू होईल. ही चर्चा गरजेनुुसार ब्रिगेडियर, मेजर जनरल किंवा कर्नल पातळीवरही होऊ शकते.
चुशूलच्या उत्तरेकडील भागात काहीशी काळजी करण्याजोगी स्थिती आहे. तिथे मागील बाजूस चीनने जवळपास 10 हजार जवान तैनात केले आहेत. तेथे रणगाडे आणि तोफखानाही तैनात करण्यात आला आहे. सुमारे 100 रणगाडे तेथे असल्याचे दिसत आहे.
ही सज्जता असतानाच चीनने लढाऊ विमानेही तैनात केली आहेत. हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार्सही आणून ठेवली आहेत. याशिवाय एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीमही कार्यान्वित केली आहे. मात्र, ही तयारी चीनने स्वच्छ सूर्यप्रकाशात केली आहे. त्यामुळे त्याचा उद्देश आक्रमणापेक्षा दबाव आणण्याचा असू शकतो, असे लष्करातील तज्ज्ञांचे मत आहे.
चीन फिंगर चारपर्यंत आला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर आठ आहे, असे भारताचे मत आहे. म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडेच चिनी सैन्य आहे, असे सरकारमधील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले.
गलवान भागात सध्या चीनचे सुमारे एक हजार जवान तैनात आहेत. तेवढेच जवान फिंगर भागातही तैनात आहेत. फिंगर क्षेत्रात चीनने बंकरची निर्मिती केली असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मात्र, चीनने दगड एकमेकांवर रचून संगर (आडोसा) बनवले असल्याचा दावा केला आहे.