जकार्ता – जी-20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. भू-राजकीय विवादांचे निराकरण व्हावे आणि जागतिक नेत्यांची महत्त्वाची बैठक अपेक्षित निर्णयांसह पूर्ण व्हावी यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी मला आशा आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे.
जकार्ता येथे 13 व्या आसिआन-युएन शिखर परिषदेत बोलताना गुटेरेस म्हणाले की, मला विश्वास आहे की, सध्याचे भू-राजकीय वाद सोडवले जातील आणि जी-20 ची सांगता आशादायक परिणामांसह व्हावी, यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. जी-20 चे यजमानपद या नात्याने भारताकडून असलेल्या अपेक्षांसह जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या गटात आफ्रिकन युनियनला आणण्यासाठी नवी दिल्लीच्या समर्थनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
गुटेरेस पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. अनेक भू-राजकीय आव्हानांच्या दरम्यान आता दिल्लीत नेत्यांची शिखर परिषद होत आहे. या आव्हानांमध्ये युक्रेन युद्ध, कोविड-19 महामारीचा प्रभाव, आर्थिक मंदी, बिघडते हवामान, वाढती गरिबी आणि असमानता यांचा समावेश आहे. भारत या सर्वच विषयांवर आघाडीवर राहून उत्तर शोधू शकतो, याची मला खात्री आहे.
गुटेरेस पुढे म्हणाले की, मी या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होत असल्याने माझ्यासाठी काही प्रश्न महत्त्वाचे असतील. परिषदेने आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचनांमध्ये सुधारणा करून त्यांना आजच्या जगाच्या गरजेनुसार अनुकूल करण्याचा स्पष्ट संदेश दिला पाहिजे. कर्जमुक्ती, विकसनशील देशांना कोविड-19, युक्रेन युद्ध आणि इतर अनेक परिस्थितींमधून सावरण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टींसह, जी -20 मध्ये एकत्र येत असलेल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसित देशांना पाहण्यात मला नक्कीच रस असेल, असे सांगून गुटेरेस पुढे म्हणाले की आपण आपत्तीजनक हवामान परिस्थितीचा सामना करत आहोत आणि हवामानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याची विकसनशील देशांची महत्त्वाकांक्षा आहे. या शिखर परिषदेदरम्यान कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेसाठी सर्व देश एकत्रित दृष्टिकोनावर येऊ शकतात की नाही हे पाहणे देखील रंजक ठरेल.