बंगळुरु :- बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दुसऱ्या दिवशीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला “इंडिया’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. त्यांच्यानुसार याचा फुल फॉर्म “”इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असा आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. “समन्वयासाठी 11 सदस्यांची एक समिती आणि एक कार्यालय लवकरच स्थापित केले जाईल. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत याची घोषणा केली जाईल,’ असेही खरगे यांनी यावेळी सांगितले.
खरगे पुढे बोलताना म्हणाले, भाजपने ईडी, सीबीआयसारख्या लोकशाही संस्था नष्ट केल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापूर्वी आम्ही पाटण्यात भेटलो होतो. तिथे 16 पक्ष उपस्थित होते. आजच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. हे पाहून एनडीए 36 पक्षांसोबत बैठक घेत आहेत. मला माहिती नाही ते पक्ष कोणते आहेत. ते नोंदणीकृतही आहेत की नाहीत? याचीही काही कल्पना नाही. सर्व मीडियावर मोदींचा कब्जा आहे. मीडिया आमच्या विरोधात इतका शत्रूतापूर्ण झाला असे आधी कुठेही बघितले गेलेले नाही.
आज आम्ही स्वतःच्या हितासाठी नव्हे तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारचे अपयश सर्वांसमोर आणणे हे आमचे ध्येय आहे. राहुल, ममतांसह सर्व सहमत असल्यावर मी आनंदी आहे. 2024 ला आम्ही एकत्र लढू आणि चांगले निकाल आणू, असेही खरगे यांनी यावेळी म्हटले.
आघाडीचे नेतृत्व कोण करेल, चेहरा कुणाचा असेल याबाबत, मुंबईच्या बैठकीत ही 11 नावे ठरवली जातील व त्यानंतरच माहिती देता येईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
“इंडिया’ नावाचा अर्थ
I – इंडियन
N-नॅशनल
D-डेव्हलपमेंटल
I-इनक्लुसिव्ह
A-अलायन्स
आघाडीतील नेत्यांंच्या प्रतिक्रीया…
देशात दलित, हिंदू, मुस्लीम प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. दिल्ली, बंगाल, मणिपूर असो, सरकारांची खरेदी-विक्री हेच त्यांचे काम आहे. आमच्या आघाडीचे नाव “इंडिया’ आहे. बीजेपी तुम्ही इंडियाला चॅलेंज करणार का?
– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
9 वर्षांत केंद्राने प्रत्येक क्षेत्र उध्वस्त केले आहे. यांनी विमानतळ, जहाज, आकाश, जमीन, पाताळ सर्व काही विकले आहे. या सरकारवर शेतकरी, व्यापारी प्रत्येक घटक असमाधानी आहे. देशात द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
आज देशाचा आवाज दाबला जात आहे. “इंडिया’ हे नाव यामुळेच निवडण्यात आले, कारण हा लढा मोदी आणि इंडिया यांच्यात आहे. कुणी इंडियाविरोधात उभा राहिल्यास तो जिंकू शकेल का? हे सर्वांना माहिती आहे. भारताच्या विचारांवर भाजपाकडून हल्ला होत आहे. बेरोजगारी वाढत आहे आणि मात्र दुसरीकडे, मोदींच्या जवळ असलेल्या अब्जाधीशांना फायदा होत आहे.
– राहुल गांधी, नेते कॉंग्रेस
होय आम्ही कुटूंब वाचविण्यासाठी एकत्र आले आहोत. परंतू, देश हेच आमचे कुटूंब आहे. देशात सगळीकडे भितीचे वातावरण आहे, मात्र मला इथे एवढेच सांगायचे आहे, “हम हैं ना!’ ही आमची दुसरी यशस्वी बैठक आहे, व पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचा आनंद आहे.
– उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री