नवी दिल्ली: प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राखण्यासाठी “जैसे थे’स्थिती कायम राखली गेली पाहिजे आणि परस्पर सहमतीने निश्चित करण्यात आलेल्य सीमा व्यवस्थापनाच्या प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे, असा स्पष्ट संदेश आज चीनच्या सैन्यदलाला देण्यात आला.
दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वपूर्ण आणि गुंतागुंतीची चर्चा पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास समाप्त झाली. त्यामध्ये भारतीय शिष्टमंडळाने पीपल्स लिबरेशन आर्मीला मर्यादांचे पालन करण्याविषयी स्पष्ट शब्दात चेतानवनी दिली. या भागातील परिस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी चीनवरच अवलंबून असल्याचेही यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले.
दोन्ही देशांची सैन्यदल एकमेकांपासून दूर नेण्याच्या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्याबाबतही या चर्चेदरम्यान एकमत झाले. सहमती झलेल्या मुद्दयांबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर पुढील चर्चेसाठी एकत्र येण्याचे यावेळी ठरले.
लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची चौथी फेरी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एलएसीच्या भारतीय बाजूच्या चुशूल येथे सुरू झाली. या चर्चेबाबत कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. लेहस्थित 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत होते. तर चीनच्या बाजूने दक्षिण झिनजियांग लष्करी विभागाचे कमांडर मेजर जनरल लियू लिन हे होते.
लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांना या चर्चेतील तपशीलाची माहिती देण्यात आली असून त्या अनुषंगाने लष्कर प्रमुखांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली असल्याचे समजते आहे.