अहमदाबाद – सध्याची जागतिक स्थिती पहाता भारताला या क्षणी स्थिर किंवा निष्क्रीय राहणे परवडणारे नाही त्यासाठी आपल्याला स्वावलंबनाचा म्हणजेच आत्मनिर्भरतेचा नारा दिला पाहिजे आणि त्यासाठीच कार्यरत राहिले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्यासाठी जनतेला स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तचू खरेदी करण्याचे आवाहन केले.आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तु खरेदी केल्या तर आपण फार लवकर आत्मनिर्भर बनू शकू आणि लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही देऊ शकू असे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील मोरबी येथे हनुमान जयंतीनिमित्त भगवान हनुमानाच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. व्हिडीओ लिंकद्वारे त्यांनी या मुर्तीचे अनावरण केले. पुढील 25 वर्षांपर्यंत लोकांनी स्थानिक वस्तू वापरल्या तर देशाला बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की संपुर्ण जगातच आता आत्मनिर्भरतेवर विचार सुरू झाला आहे.
पंतप्रधान म्हणाले की मी देशातील संतांना व समाजातील ज्येष्ठांना अशी विनंती करेन की त्यांनी लोकांना फक्त स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची शिकवण दिली पाहिजे. आपल्या घरी, आपण आपल्या लोकांनी बनवलेल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणे आपल्याला शक्य होईल.
पुढील 25 वर्ष आपण केवळ स्थानिक पातळीवर उत्पादित झालेल्या वस्तुंचाच वापर केला तर देशात बेरोजगारीची समस्याच राहणार नाही असे त्यांनी नमूद केले.