नगर -जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातून संरक्षण किट पळविल्याच्या “त्या’ कथित घटनेचा लवकरच तपास होईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यास आज सात दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
यामुळे उच्चस्तरीय चौकशी तातडीने व्हावी. तसेच तोपर्यंत ज्यांच्यावर गैरप्रकाराचा आरोप ठेवण्यात आला आहे, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यास बडतर्फ करावे, अशी मागणी छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केली आहे.
काळे यांनी या संदर्भात उपोषणाची नोटीस दिल्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या यंत्रणेने त्यांना उपोषण करू नये, असे पत्र दिले. कथित आरोपाची गोपनिय चौकशी झाली असून, त्याचा अहवाल नाशिकच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविला असल्याचे पत्र काळे यांना देण्यात आले आहे.
तथापि, हा तपास करताना तक्रारदारांना कुठेही विचारणा झाली नाही किंवा त्यांच्यामार्फत चौकशी झाली, तीच चुकीची आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत: ही चौकशी उच्चस्तरीय समितीकडून होईल, असे जाहीर केले होते. तसेच दस्तुरखुद्द जिल्हा शल्यचिकित्सक यांनीही कथित संरक्षण किट वाहनात होते, या वृत्ताला दुजोरा दिला होता.
त्यामुळे अगोदर ज्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे, त्यांना ताततडीने निलंबित करण्याची गरज होती. मात्र, तसा कोणताही निर्णय न घेता केवळ तपास पूर्ण करण्यात आला असल्याने कागदोपत्री रंगविण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरोपात उपस्थित केलेल्या मुद्यांवर चौकशी समितीने काय अभिप्राय दिला, याबाबत तक्रारदारांना काहीच कळविण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या पातळीवर झालेला अहवाल जोपर्यंत तक्रारदारांना उपलब्ध करुन देण्यात येत नाही, तोपर्यंत हा अहवाल देखील संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब काळे यांनी केला आहे.
नगरमध्ये पहिल्या टप्प्यात करोनाचे जास्त रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील केईएम हॉस्पिटलतर्फे अतिउच्च दर्जाचे 150 पीपीई किट, 200 फेस शिल्ड, 100 एन-95 मास्क, 200 कापडी मास्क व वॉर्डाकरीता लागणारे 100 गाऊन पाठविण्यात आले होते. 15 एप्रिलला पाठविलेले हे संरक्षण किट त्या अधिकाऱ्याने पळवून नेल्याचा दावा दादासाहेब काळे यांनी केला होता. करोना महामारीच्या संकटात हा आरोप झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.