मुंबई – सलामीवीर मयंक अग्रवालची दीड शतकी खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने न्यूजीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात 372 धावांनी विजय मिळवून मालिका 1-0 अशा फरकाने खिशात घातली. मयंक अग्रवाल सामनावीर ठरला. तर रविचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आलं.
भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला व न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव आज 56.3 षटकांत 167 धावांत संपुष्टात आला. सोमवारी 5 बाद 140 धावापासून पुढे खेळण्यास आलेल्या न्यूझीलंडची फलंदाजी अवघ्या 27 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात डेरील मिचेलने सर्वाधिक 60 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, भारतीय संघाने रविवारी दुसऱ्या दिवशीच्या बिनबाद 69 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर पहिल्या डावातील दीडशतकवीर मयंक आग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. पुजारा मात्र अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. मयंकने मात्र आपले अर्धशतक पूर्ण केले. एकाच कसोटीत शतक व अर्धशतक फटकावत त्याने आपले नावही अशी कामगिरी केलेल्या दिग्गजांच्या यादीत जमा केले. त्याने 9 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.