India vs Australia 2nd T20 Match in Trivandrum :- पहिल्या सामन्यात सरासरी कामगिरी करणारे भारताचे युवा गोलंदाज आपल्या चुकांमधून शिकतील आणि रविवारी येथील ग्रीनफिल्ड मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया…
ठिकाण : ग्रीनफिल्ड, तिरुवनंतपुरम
वेळ : सायंकाळी ७ वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट स्टार १८
भारताने विशाखापट्टणम येथे पहिला सामना दोन विकेट्सने जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार वगळता इतर भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही, हेही तितकेच सत्य आहे. त्यात आता ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी आणि परिस्थिती फारशी वेगळी असणार नाही, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करावीच लागणार आहे.
ग्रीनफिल्ड मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. टीम इंडियाने येथे आतापर्यंत एकूण ३ सामने खेळले आहेत. ज्यापैकी २ सामने जिंकले असून एका सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारताने पहिला टी-२० सामना नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तो ६ धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. हा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता.
महत्त्वाची बाब म्हणजे, या मैदानावर शिवम दुबेने भारतासाठी अर्धशतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावले आहे. सूर्याने ३३ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. शिवमने ३० चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार सूर्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
सुर्याने रोहितला टाकले मागे…
खरं तर, टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने रोहितला मागे सोडले. रोहितने १२ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आहे. तर सूर्याने १३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या बाबतीत विराट कोहली(१५) आघाडीवर तर मोहम्मद नबी(१४) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक विजय…
पाकिस्तान – १३५
भारत – १३५
न्यूझीलंड – १०२
दक्षिण आफ्रिका – ९५
ऑस्ट्रेलिया – ९४
भारत केवळ एक विजय दूर…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध या सामन्यात विजय मिळवल्यास टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा संघ ठरण्याची भारताला संधी आहे. सध्या पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आहे. पाकिस्तानने आतापर्यंत सर्वाधिक १३५ टी-२० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने शेवटच्या सामन्यात १३४ वा. विजय मिळविलेला आहे.
खेळपट्टी गोलंदाजीस पोषक…
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. म्हणजेच फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नाही. या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचे सामने झाले आहेत. या मैदानावर टी-२० फॉरमॅटमध्ये सरासरी धावसंख्या केवळ ११४ इतकी आहे. त्याच वेळी, नाणेफेक जिंकून संघ येथे धावांचा पाठलाग करण्यास पसंती देतात. आतापर्यंत २ सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर १ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगसह अन्य गोलंदाजांवर लक्ष असणार आहे.