मुंबई – राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले होते. याबाबत महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ केली आहे. मानधनवाढीचा लाभ राज्यातील 500 हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे.
3 हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरण कंपनीकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रान्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दरमहा 3 हजार रुपये मानधन देण्यात येत होते.
कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.