राहाता – करोना संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर सुरु असुन, मंत्री केवळ मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडीओ कॉन्फरंसिंगवर दिसते, अशी टिका माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मास्क बांधुन आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोणी बुद्रूक येथे झालेल्या आंदोलनात माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, नंदु राठी, सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अनिल विखे उपस्थित होते.
आ.विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपुर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहचवू शकले नसल्याने सरकारच्या या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरीक मृत्युच्या खाईत लोटला गेल्याचा थेट आरोप त्यांनी केला.केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांपर्यंत पोहचले नाहीत. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविताना आघाडी सरकार अतिशय असंवेदनशिल वागले. राज्याच्या हद्दीपर्यंत सरकारने मदत केंद्र उभी करायला हवी होती, पण सरकार तेही करु शकले नाही अशी खंत व्यक्त केली.