संगमनेर -शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगार बरोबरच उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात कमी पाण्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सन 2019- 20 या हंगामात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते.
यावेळी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर घुगरकर आदी उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, दूध व ऊस हे शाश्वत उत्पादन आहे.
मात्र शेतकऱ्यांनी त्याकडे व्यावसायिकतेतून पाहणे गरजेचे आहे. यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन करताना उत्पादन खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. उत्पादन खर्च करून उत्पादकता वाढवली तर त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना होईल. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.