गाझियाबाद, (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या मूळ गावी पायी परत निघालेल्या काही स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी वाटेतच रोखले आहे. राष्ट्रीय महामार्ग-9 वरून हे स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चालले होते. हे सर्व स्थलांतरित मजूर दिल्लीतून पायी आपल्या गावाकडे जायला निघाले होते. आपल्यासाठी कोणतीही रेल्वे अथवा बस सेवा उपलब्ध करून दिली गेली नसल्याने आपल्याला पायीच आपल्या गावी परतण्याचा पर्याय स्वीकारावा लागला, असे या मजुरांनी सांगितले.
हे सर्व मजूर दिल्लीतील मडावली भागात रहाणारे असून त्यांना आझमगडपर्यंत जायचे आहे. जवळचे सर्व पैसे संपले. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते आहे. आता काहीही खाद्यपदार्थ घेण्याइतके पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. राहण्यासाठी जी जागा होती, त्या जागामालकाला भाडे देण्याइतकेही पैसे शिल्लक नाहीत. जागा मालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत.
सर्व उत्पन्नाचे स्रोतही संपल्यामुळे आता गावी परतण्यावाचून कोणताही पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिला नसल्याचे या मजुरांनी सांगितले. गाझियाबाद येथून बस उपलब्ध आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र पोलीस गाझियाबादमध्येही जाऊ देत नाहीत. शिवाय पोलिसांनी आपल्याला मारहाणही केल्याचे या मजुरांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थलांतरित मजुरांना मूळ गावी परत जाऊ देण्याची परवानगी दिली आहे. काही राज्यांमध्ये रेल्वेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांनी या स्थलांतरित मजुरांना आपल्या राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाकारली आहे.