नवी दिल्ली – इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत आतापर्यंत भारतीय संघाला उल्लेखनीय अशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशा फरकाने पिछाडीवर आहे.
या मालिकेतील चौथा सामना आज खेळला जाणार आहे. तत्पुर्वी तिसर्या सामन्यात फलंदाजी करताना विराट कोहलीने दमदार कामगिरी केली होती. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याने नकोशा अशा विक्रमाची नोंद केली आहे.
तिसर्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा डाव सुरू असताना जोस बटलर हा 73 धावा खेळत होता, तेव्हा विराट कोहलीने त्याचा एक झेल सोडला होता. त्यानंतर जोस बटलरने नाबाद 83 धावांची खेळी करून इंग्लंडला विजय मिळवून दिला. तसेच युजवेंद्र चहलने एक झेल सोडला होता.
टी-20 क्रिकेटमध्ये 2019 पासून आतापर्यंत विराट कोहलीने सर्वाधिक 6 झेल सोडले आहेत. त्याचबरोबर या दरम्यान त्याने 9 झेल घेतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुद्धा भारतीय संघाने खराब क्षेत्ररक्षण केले होते. त्या अगोदर यूएईत पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत सुद्धा विराट कोहलीबरोबर इतर ही खेळाडूंनी झेल सोडले होते.
सर्वाधिक जास्त झेल सोडणाऱ्या टॉप 4 मध्ये आहेत दोन भारतीय खेळाडू
2019 पासून आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक झेल सोडणाऱ्या टॉप 4 च्या यादीत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीने 6 झेल सोडले तर, इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनने 5 झेल सोडले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने आणि भारताच्या युजवेंद्र चहलने प्रत्येकी 4 झेल सोडले आहेत.
परंतु या दरम्यान क्रिस जॉर्डनने 15 आणि स्टीव्ह स्मिथने 11 झेल घेतले आहेत. मात्र युजवेंद्र चहलला फक्त 2 झेल घेता आले आहेत. तिसर्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने गचाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले होते.
या सामन्याच्या समाप्तीनंतर विराट कोहली म्हणाला होता की, मैदानावर ज्या प्रकारे आम्ही क्षेत्ररक्षण केले, ते स्विकारले जाऊ शकत नाही. विराट कोहली आपल्या फिटनेस बाबतीत नेहमीच गंभीर असतो. मात्र फिटनेस टेस्ट पास न करू शकल्याने वरुण चक्रवर्तीला बाहेर बसावं लागलं.