चंदीगड – कॉंग्रेस मधूनच पुन्हा कॅ. अमरिंदरसिंग यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मध्यंतरी सिद्धु यांच्या नियुक्तीवरून कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेले वादंग कसेबसे शांत झालेले असतानाच आता पुन्हा हा विषय उफाळून आला आहे. कॉंग्रेसच्या 34 आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पक्षश्रेष्टींकडे धाव घ्यायचे ठरवले आहे. त्यात चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.
या नाराज आमदारांची नुकतीच एक बैठक झाली. त्यात राज्यातील नेतृत्व बदलण्याची हीच योग्य वेळ आहे अशी भूमिका त्यात मांडण्यात आली आहे. राज्यात लवकरच पुन्हा निवडणूका होणार आहेत. त्यात कॅ अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळण्याची शक्यता नाही अशी भावना यातील अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे असे सांगण्यात येते.
याच बैठकीत पक्षाच्या नाराज आमदारांचे म्हणणे पक्षश्रेष्ठींच्या कानी घालण्यासाठी पाच जणांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्या समितीला आमदारांच्या गटाचे सर्वाधिकार देण्यात आले आहे. या पाच जणांच्या समितीत कॅबिनेट मंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांचाही समावेश आहे. ते प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धु यांचे समर्थक मानले जातात.
नाराज आमदारांमध्येही अनेक जण सिद्धु यांचे समर्थक आहेत. राज्यात वाळू, ड्रग्ज आणि ट्रान्स्पोर्ट माफियांचे राज्य निर्माण झाले असून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याची टीका करण्यात आली आहे.