तळेघर -दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अता मृत्यूची संख्याही वाढत आहे. तरीही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. मिळेल त्या गाडीने व वाटेल तेवढे पैसे खर्च करूनही लोक आपल्या बरोबर दुसऱ्यांचाही जीवाची पर्वा न करता कर्जत-नांदगावमार्गे भीमाशंकरचे उंच घाट चढून गावाकडे येऊ लागले आहेत.
भीमाशंकरलावर येण्यासाठी शिडी घाट व बैल घाट अशी दोन अत्यंत धोकादायक घाट आहेत. यामुळे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचे संकट वाढले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी भीमाशंकर व पालखेवाडी येथे सुरक्षा वाढवली आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातही करोना व्हायरसने शिरकाव केला आहे, याची खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक उपाय योजना केलेले आहेत. आपण आहोत त्याच ठिकाणी थांबा व प्रशासनास मदत करा’ असे आवाहन शासनाकडून दररोज होत आहे. परंतु काही नागरिक याचे पालन करीत नसल्याचा चित्र दिसत आहे.
आंबेगाव, जुन्नर, खेड तालुकयातील अनेक लोक मुंबईमध्ये राहतात. हे सर्व लोक महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला धुडकावून आपल्या गावाकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी लॉकडाऊन झाला त्यावेळी अनेक लोक आपल्या घरी आले; परंतु वाढत चाललेल्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उर्वरित लोक देखील आपल्या जीवाची पर्वा न करता गावाकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत.
किमान करोना आणि हिंस्र प्राण्यांना तरी भीती बाळगा
गावाकडे येण्यासाठी सकाळी पकडले जावू या भीतीने आता रात्री अन् तेही पायी किंवा मिळेल त्या गाडीने भीमाशंकर, आहुपे, दुर्ग देवी, नाणेघाट येथील घाट चढूनवर येत आहे. या भागांत वन्य हिंस्त्र प्राण्याचा वावर जास्त असल्यामुळे महिला, लहान मुले, वृद्ध ही आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवास करीत आहेत. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागामध्येही स्थिती असल्याने आपण कसा करोनाला रोखणार असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
तर प्रशासनही कोठे कोठे लक्ष देणार आणि शेवटी तेही माणसे असून त्यांनाही करोनाचा धोका आहे. तरी नागरिकांनी कृपाकरून आहे तिथेच थांबावे विनाकारण बाहेर पडू नये, अशी विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.
भीमाशंकरचा शिडी घाट असो किंवा बैल घाटाने वर येणारे लोक थांबवण्यासाठी घोडेगाव पोलिसांनी पोलिसांची ठिकठिकाणे गस्ती पथके नेमली आहेत. आहुपे येथे ही पथके नेमली आहेत. जी लोक अंधाराचा फायदा घेऊन जंगलमार्गे प्रवास करतात त्यांच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही मदत घेतली गेली आहे. अशा प्रकारे येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी गावच्या लोकांनी देखील सतर्क राहिले पाहिजे व नवीन येणाऱ्या लोकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.
– प्रदीप पवार, सहाय्यक निरीक्षक, घोडेगाव पोलीस ठाणे