श्रीनगर -राज्यघटनेचे कलम 370 हटवण्याइतकी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सोपी नाही. त्यामुळे ते पाऊल उचलण्याचा विचारही करू नये, असा सल्लावजा इशारा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला दिला. समान नागरी कायद्याचा संबंध सर्व धर्मांशी आहे. ते धर्म कायद्यामुळे प्रभावित होतील. एकाच वेळी सर्वांचा राग ओढवून घेणे कुठल्याही सरकारसाठी चांगले नाही, अशी भूमिका आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. त्याचा संदर्भ देऊन आझाद यांनी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला. कॉंग्रेसला रामराम ठोकून आझाद यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांच्यावर भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, विविध मुद्द्यांवर परखड भाष्य करून ते भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य करताना दिसतात.