* विमानतळ विरोधासाठी सात गावे एकवटली
* विमानतळ विरोधाचा एक सैनिक म्हणून शेतकऱ्यांबरोबर
बेलसर – पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ठराविक व्यक्तींच्या स्वार्थासाठी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. विमानतळाला या सात गावांतील जागा योग्य नाही याचा अहवाल यापूर्वी शासना समोर मांडला आहे. सरकार बदलले आणि पुन्हा आता याठिकाणी विमानतळासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत; मात्र या विमानतळ विरोधाच्या लढ्यात मी एक विमानतळ विरोधाचा सैनिक म्हणून या सर्व शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करून विमानतळ करू पाहणाऱ्यांच्या घरी वेळ आल्यास काळे झेंडे लावू, असे आमदार संजय जगताप जाहीर केले.
पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सात गावांतील गावकरी एकत्र जमत आहेत. सरकारकडून जागा निश्चित होऊन पुढील कार्यवाही सुरू झाली आहे, त्याच अनुषंगाने पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील पारेश्वर मंदिरामध्ये सोमवारी (दि. 10) नियोजित पुरंदर आंतराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा विरोध दर्शवण्यासाठी पारगांव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वनपुरी व उदाचीवाडी या गावातील शेतकऱ्यांनी सभा घेऊन विमानतळाला जागा द्यायचीच नाही अशी भूमिका पुन्हा घेतली, त्यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी माजी जि. प. सदस्य दत्तात्रय झुरंगे, माऊली यादव, गौरव कोलते, पारगांव च्या माजी सरपंच प्रियंका मेमाणे,उपसरपंच चेतन मेमाणे, कुंभारवळणचे माजी सरपंच अमोल कामठे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, उदाचिवाडी चे सरपंच संतोष कुंभारकर, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, उपसरपंच स्वप्निल होले, एखतपूर मुंजवडीचे कृष्णा झुरंगे, शिवाजी कोलते, संतोष हगवणे, जितेंद्र मेमाणे, देविदास कामठे, विठ्ठल मेमाणे, सर्जेराव मेमाणे, लक्ष्मण गायकवाड आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, आपली शेती ही आपल्याला शाश्वत उत्पन्न देणारी आहे. पैसा हा कायम रहात नसतो त्यामुळे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी देखील अशीच एकी ठेवा, माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांचे नुकसान करून असा कोणताच प्रकल्प झाला नाही पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुरंदर विमानतळ विरोधाचा लढा आपण गेली सहा वर्षे लढतोय आणि त्यात आपल्याला नक्की यश येणार आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचा या प्रकल्पला विरोध आहे आणि तो कायम असेल. वेळ आल्यास पुन्हा आंदोलन केली जातील कायदेशीर लढा देखील दिला जाईल. विमानतळासाठी याठिकाणी जमीन मिळणार नाही.
– दत्तात्रय झुरंगे, अध्यक्ष, विमानतळ विरोधी संघर्ष समिती