संदीप घिसे
पिंपरी –पहिली, दुसरीच्या मुलाला अक्षर ओळखता येत नसल्यास त्यास मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक जबाबदार असणार आहेत. पालक याबाबत शाळा आणि शिक्षण विभागाला जाब विचार शकतात आणि प्रसंगी संबंधितांवर कारवाई देखील होऊ शकते. आरटीईच्या कायद्यामध्ये याबाबतची तरतूद आहे.
गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) कायदा केला. मात्र अनेक शाळांत आरटीईमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. मात्र पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्याला अक्षर ओळखता येत नसेल किंवा तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्याला वाचता येत नसेल तर पालक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांना जाब विचारू शकतात.
पालकांनी सांगितल्यावरही जर त्यात अपेक्षित सुधारणा झाली नाही तर मग पालक याबाबत शिक्षण विभागाकडे दाद मागू शकतात. आरटीई कायद्यामध्ये याबाबतची तरतूद आहे. शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत तक्रार आल्यास हा विभाग वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांना विचारणा करू शकतो. तसेच प्रसंगी वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याला अक्षर ओळख येणे आणि तिसरी चौथीच्या विद्यार्थ्याला वाचन करता आले पाहिजे. याबाबत आरटीई कायद्यात तरतूद आहे. तसे न झाल्यास पालक तक्रार करू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पालकांची तक्रार आलेली नाही.
– संदीप खोत, उपायुक्त-शिक्षण विभाग, पिं. चि. मनपा