नगर – शेती सुखाची राहिली नाही, देशात कुठेही शेती सुखाचे असल्याचे चित्र नाही. कारण शेती विषयक धोरणच ठरवले गेलेले नाही. त्यामुळे नोकरी सुखाची झाली आहे. जो उठतो नोकरी मागतो. म्हणून आरक्षण पाहिजे आहे. आता नोकरी असेल तरच पोरगी मिळते, म्हणूनही नोकरीत आरक्षण हवे आहे. शेतीविषयक धोरण ठरले असते तर आरक्षणाची गरजही भासणार नाही, असे मत आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू व्यक्त केले.
दिव्यांग कल्याण व समाजकल्याण विभागातर्फे मंगळवारी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आ. कडू उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आ. कडू म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची साधी, सरळ, सोपी गोष्ट होती. ती आता अवघड करून ठेवली, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या, नाहीतर कुणबी आहेत असे समजून परिपत्रक काढायला काहीच हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला.
आमच्या वाडवडिलांच्या महसूली कागदपत्रात कुणबी नोंद आहे, त्याआधारे आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. मराठा हे मुलखाचे नाव आहे. जातीचे नाव नाही. मराठा हे कुणबीच होते. शिवाजी महाराजांच्या काळात मराठी आले म्हणजे “आठरापकड जातीचे एकत्र लढणारे सैनिक आले’ असा होता. मराठा हे ध्येयाचे व गर्वाचे नाव होते. कुणबी म्हणजे शेतकरी होते. आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, सर्वांना शिक्षण मोफत मिळाले. शेतीवर भर दिला. गावातील तरुणांना ताकद दिली तर तो तुमच्याकडे आरक्षण मागायला येणार नाही. आरक्षण फेकून देईल असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. त्यासंदर्भात बोलताना आ. कडू म्हणाले, विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचे सांगितले. सर्व आमदारांकडून त्यांचे म्हणणे काय आहे, याबाबत दोन पानी पत्र मागवा, मते मागवा, अन्यथा जो समाज आम्हाला भेटेल त्याबद्दल आम्ही गोडगोड बोलतो.
उद्या आमदार खासदारांची घरे फोडली जातील
शेतीविषयक धोरण ठरविण्यात न आल्याने पूर्वी उत्तम असलेली शेती आता दुय्यम झाली आहे. नोकरी उत्तम झाली, जो काम करतो. त्याला जेवढा पगार मिळतो आणि जो काम करीत नाही त्यालाही तेवढाच पगार मिळतो. कष्टकऱ्यांसारखे कौशल्य आमदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे नसते. परंतु कष्ट करायला किती पैसे मिळतात, त्या तुलनेत आमदार, जिल्हाधिकाऱ्यांना किती मिळतात? एक इमारत बांधणारा गवंडी आणि या इमारतीवर एक नजर टाकून जाणारा इंजिनियर यांना मिळणारे वेतन ही विषमता वाढवत आहे. या विषमतेमुळे उद्या आमदार, खासदारांची घरे फोडली जातील, असा इशारा आ. कडू यांनी दिला.