पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी गणेश मंडळांना भेटी देत नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील, त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटीसाठी पवार गुरुवार (दि.8) रोजी शहरात आल होते. काळेवाडी येथील श्री कृष्ण मंदिराच्या भेटीपासून दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. रात्री साडेनऊ पर्यंत त्यांनी शहरातील विविध भागातील गणेश मंडळांना भेटी देऊन आरती केली.
अजितदादा पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ तसेच पिंपरी गावातील तीन मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अजितदादा यांचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी काटे परिवाराच्या वतीने दादाचा सत्कार श्री गणेशाची मुर्ती व शाल, पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलासशेठ लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. काळेवाडीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, दोन वर्ष करोनाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही.
साधेपणाने सण साजरा
करावे लागले. गणेश मंडळांना भेटी दिल्याने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात. मंडळांनाही चांगले वाटते. मला पण एक समाधान मिळते. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माझा दौरा नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील. मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. हा माझा स्वभाव नाही. पिंपरी-चिंचवडने अनेक वर्ष मला अतोनात प्रेम दिले आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच या भागातूनच झाली. तेव्हापासून या सगळ्या जनतेशी माझा संबंध आहे. मी कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असले कार्यक्रम करत नसतो, असेही पवार म्हणाले.
बारामतीत भाजपचे स्वागत
बारामती लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने चांगलेच लक्ष घातले आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीत त्यांचे स्वागत आहे. बघू बारामतीची जनता कोणाला कौल देते.
“त्या” प्रकरणी जे दोषी असतील त्यांना शासन करा
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचे समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, कुठल्याही देशद्रोही व्यक्तीच्या संदर्भामध्ये कोणीही असू द्या, त्यांच्यासंदर्भात अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये कदापी घडता कामा नये. सध्या महागाई आणि बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असले काही तरी मुद्दे काढायचे. आता केंद्रात, राज्यात त्यांचे सरकार आहे. याच्यामागे कोण आहे. कोणी हे सगळे केले ते शोधून काढा आणि जे दोषी असतील त्यांना शासन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे
यंदा पाऊस समाधानकारक पडला आहे. पण, पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसान केलेले आहे. बुधवारीही कोकणसह काही भागात जोराचा पाऊस झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्यांना उभे करायचे, सावरायचे असते. त्यांना मदत करायची असते. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.