भुवनेश्वर – रविवारी रात्री आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर थडकलेल्या गुलाब चक्रिवादळामुळे ओडिशामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 95 किलोमीटरवरील गोपालपूरमध्ये खबरदारी म्हणून अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
चक्रिवादळ जमिनीवर उतरले तेंव्हा शेजारील आंध्र आणि तामीळनाडूतील वाऱ्याच्या वेगापेक्षा ओडिशातील वाऱ्याचा वेग खूपच कमी होता. रविवारी दुपारी 12 वाजण्यानंतर वादळाचा वेग अचानक वाढला आणि ते बंगालच्या उपसागराच्या दिशेने वळाले. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 25 किलोमीटर इतका होता, त्यापूर्वी वाऱ्याचा वेग ताशी 17 किलोमीटर इतका होता. हे वादळ अपेक्षेपेक्षा 3 तास आगोदरच जमिनीवर उतरले, असे विशेष मदत आयुक्त पी.के. जेना यांनी सांगितले.
वादळाच्या लॅन्डफॉलनंतर अवघ्या 3 तासात म्हणजे संध्याकाळी 6 वाजता सर्वसामान्य व्यवहार पुन्हा सुरू झाले. ओडिशात कोठेही सोसाट्याचे वारे वाहिले नाहीत आणि कोठेही जोरदार पाऊस झाला नाही.
काही जिल्ह्यांमध्ये अगदी तुरळक पाऊस झाला असेही जेना यांनी सांगितले. आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील कलिंगापटणम जवळच्या मिदुगुडा आणि टोकाली गावांमध्ये या चक्रिवादळाचा लॅन्डफॉल झाला, असे भारतीय हवामान संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आज हे वादळ ओडिशातून छत्तीसगडमध्ये जाणार आहे. त्यामुळे कोरापुट, रायगडा आणि गजपती जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किलोमीटर राहण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेलंगणच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता
गुलाब चक्रिवादळामुळे तेलंगणच्या काही भागांमध्ये आज अतिवृष्टी झाली. काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोकाही असून यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.