खाद्य मिळवण्यासाठी धडपड वाढली
भवानीनगर-कण्हेरी (ता. बारामती) भागांमध्ये गेल्या महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला आहे. मंगळवारी (दि.11) पहाटेच्या दरम्यान कण्हेरी गावातील रामचंद्र मारुती शिंदे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या कळपातील एक दीड वर्षाच्या वयाच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला करून मेंढीला केले. या भागातील उसाचे क्षेत्र संपल्याने लपण्यासाठी जागा नाही, तसेच परिसरातील भक्ष्य संपल्यामुळे बिबट्याने खाद्य मिळवण्यासाठी आपला मोर्चा मानवी वस्ती, गावाकडे वळविलाआहे.
या भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याने तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वन विभागाचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे, वन कर्मचारी दत्तात्रय पाटोळे यांनी तसेच रेस्क्यू टीम पुणे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.
आज पर्यंत काटेवाडी, कण्हेरी भागांमध्ये बिबट्याचा फक्त शेतामध्येच वावर असल्याचा पुरावा मिळत होता. परंतु आता बिबट्याने या परिसरातील शेता मधून गावाकडे मोर्चा वळवला आहे. बिबट्याने गावालगत असलेल्या घरालगत गोठ्यातील एका मेंढीवर हल्ला केल्याने बिबट्या आता गावातही येऊ शकतो हा विचार करून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
बारामती वन विभागाने कण्हेरी, काटेवाडी भागांमध्ये पिंजरे लावलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावलेले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे या भागातील असणारे कॅमेराच्या समोरून गेल्यास कॅमेरात बिबट्या कैद होऊन वनविभागाला या बिबट्याबाबत माहिती मिळणार आहे. परंतु या अगोदर या भागात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहे.
गावातील रामचंद्र मारुती शिंदे यांच्या गोठ्यातील मेंढी वर बिबट्याने हल्ला केला अशाच प्रकारचे कण्हेरी गावामध्ये अजूनही मेंढ्या आणि जनावरांचे गोठे आहेत. या गावातील नागरिकांना आत्ता बिबट्या गावात येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करू शकतो हे लक्षात आल्याने गावातील नागरिक तणावाखाली वावरत आहेत. दर दोन दिवसाला बिबट्याने हल्ला केलेला निदर्शनात येत असल्याने बिबट्याने हल्ला करण्याचे सत्र थांबवणे कठीण होत असल्याने वन विभागाचे अधिकारी ही बिबट्याला पकडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.
- शेतात नव्हे, आता दारातच-
शेतकरी मात्र अगोदर शेतामध्ये जात नव्हता तो बिबट्याच्या भीतीपोटी परंतु आता बिबट्या दारातच आल्याने बिबट्याची भीती अजूनही मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये निर्माण झाली आहे. पुणे वनविभाग आणि बारामती वन विभाग यांनी बिबट्या या वन्य प्राण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व काटेवाडी कण्हेरी या भागांमध्ये पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले लक्षात घेऊन तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.